Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 29 March, 2009

वरुण गांधींना अटक


सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी



सोमवारी जामीन अर्ज प्रकरणी पुढील सुनावणी
वरुण यांचा प्रक्षोभक भाषण दिल्याचा इन्कार
समर्थकांचा तुरुंगाला वेढा आणि दगफेक
पोलिसांचा हवेत गोळीबार; समर्थकांवर लाठीमार
पोलिसांसह अनेक कार्यकर्तेसमर्थक जखमी

पिलिभीत, दि. २८ - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते वरुण गांधी यांनी प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी शनिवारी स्थानिक न्यायालयात समर्पण केल्यानंतर त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
समर्पण करतेवेळीच जामीन अर्जही त्यांनी न्यायालयात सादर केला. मुख्य न्याय दंडाधिकारी विपिन कुमार यांनी जामीन अर्जावर आजच सुनावणी करण्याचे अपील फेटाळून लावताना वरुण यांना दोन दिवसांकरिता तुरुंगात पाठविले असून या प्रकरणी सोमवार ३० मार्च रोजी पुढील सुनावणी केली जाईल असा निर्णय दिला. यानंतर वरुण यांनी न्यायालयापासून अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या तुरुंगात पायीच जाण्याचा निर्णय घेतला अशी माहिती वरिष्ठ भाजप नेते कलराज मिश्र यांनी दिली. उत्तर प्रदेशातील भाजपचे निवडणूक प्रचार प्रमुख मिश्रा येथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आले आहेत.
वरुण यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपचे झेंडे हाती घेऊन त्यांचे हजारो समर्थक पिलिभीतच्या रस्त्यावर आले व त्यांनी तुरुंगाला वेढा घातला. "वरुण गांधी झिंदाबाद अशा घोषणा तुरुंग परिसरात ऐकू येत होत्या. समर्थकांनी जोरदार दगडफेक केल्यामुळे त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले आणि हवेत गोळीबार केला. याचा वरुण समर्थकांवर फारसा परिणाम होत नसल्याचे बघून पोलिसांनी समर्थकांवर अमानुषपणे लाठीमार केला. यात अनेक समर्थक जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
"उत्तर प्रदेशातील लोकांना सुरक्षित वाटावे, तसेच त्यांची हिंमत वाढविण्यासाठी मी पिलिभीत येथे आलो आहे. काहीही झाले तरी मी माघार घेणार नाही. आपल्या सिद्धांतांवर कायम राहीन. माझ्या अटकेने जर लोकांची हिंमत वाढत असेल तर मी तुरुंगात जायला तयार आहे. मी कोणतेही प्रक्षोभक भाषण केले नाही' असे न्यायालयात समर्पण करण्यापूर्वी वरुण म्हणाले होते. वादग्रस्त भाषण प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन याचिका परत घेतल्यानंतर स्वत:ला अटक करवून घेण्यासाठी ते येथे आले होते हे विशेष! त्यामुळे मोठ्या संख्येत भाजपा कार्यकर्ते पिलिभीत येथे जमा झाले होते. ते वरुण गांधी यांच्या आगमनाची वाट बघत होते. दरम्यान, वरुण गांधी पिलिभीत येथे येण्यापूर्वी त्यांच्या समर्थनार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या "रास्ता रोको'ला हिंसक वळण लागले. भाजपा कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीनंतर भाजपा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
वरुण यांच्याविरुद्ध कोणताही वॉरंट नसून त्यांना समर्पण करायचे असेल तर त्यांनी एक प्रतिज्ञापत्र द्यावे व त्यात त्या कलमांचा उल्लेख करावा ज्यातंअर्गत त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे, असे न्यायालयीन कारवाईदरम्यान न्यायाधीशांनी त्यांच्या वकिलांना सांगितले. अन् नंतर वरुण यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे त्यांचे समर्थक भडकले व त्यांनी न्यायालय आणि तुरुंग परिसर दणाणून सोडला. बराचवेळ पोलिस व वरुण समर्थकांमध्ये झडप होत राहिली. यात पोलिस व समर्थक जखमी झाले.
भाजपा कार्यकर्त्यांना भांदविच्या कलम १४४ अंतर्गत बेकायदा एकाच ठिकाणी जमाव केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून पिलिभीत येथे सुरक्षा दल तैनात करण्यात आल्याचेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. वरुण यांच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या ५० भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती जिल्हा भाजपाध्यक्ष योगेंद्र गंगवार यांनी दिली.
वरुण पिलिभीत येथे दाखल होण्यापूर्वीच्या घटनाक्रमांतर्गतच सकाळी वरुण गांधी यांना राजकीय लाभ मिळू नये म्हणून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांना अटक करू नका असे निर्देश पोलिसांना दिले होते. त्याचप्रमाणे वरुण यांच्या भाषणाची व्हिडिओ टेप फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविल्यामुळे त्यांना अटक झाली नाही असे पोलिसांनी सांगितले.
वरुण यांचे समर्पण म्हणजे नाटक : कॉंग्रेस
वरुण गांधी यांनी न्यायालयात केलेले समर्पण आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक याला कॉंग्रेसने नाटक संबोधले. वरुण नाटक करीत आहेत. या संपूर्ण प्रकारामागे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांचा हात असल्याची आमची खात्री आहे. त्यांच्या संमतीशिवाय असे घडूच शकत नाही अशी टीका दिल्ली येथे कॉंग्रेस प्रवक्ते कपिल सिब्बल यांनी केली.

No comments: