Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 31 March, 2009

मंदिर सुरक्षा समितीची कॉंग्रेसला वाटते धास्ती!

निवडणूक आयोगाचा बडगा शक्य
पणजी, दि. ३०(प्रतिनिधी)- राज्यात सातत्याने हिंदू देवतांची मंदिरे व मूर्तींची विटंबना, भंजनाचे प्रकार घडूनही गुन्हेगारांना पकडण्यात सरकारला अपयश आल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व हिंदूंनी कॉंग्रेस विरोधात मतदान करावे, या मंदिर सुरक्षा समितीच्या जाहीर आवाहनामुळे कॉंग्रेसचे धाबे दणाणले आहेत. गृहमंत्री रवी नाईक यांच्या विधानसभेतील बेफिकीर भूमिकेचाही समितीने जाहीर निषेध करून कॉंग्रेसविरोधात व्यापक मोहीम उघडण्याची घोषणा केल्याने मंदिर सुरक्षा समितीला कोणत्याही परिस्थितीत रोखण्याची जोरदार तयारी सध्या सरकारने सुरू केल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
मंदिर सुरक्षा समितीने केलेल्या आवाहनाचे वृत्त सरकारतर्फे दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींच्या नजरेसही आणून देण्यात आले आहे. आता निवडणूक आयोगामार्फत या समितीच्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता असल्याने हा विषय अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीचे निमंत्रक राजेंद्र वेलिंगकर यांनी नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत कॉंग्रेस सरकारवर सडकून टीका केली होती. मंदिर तोडफोड व मूर्तिभंजन प्रकरणी गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले असताना केवळ अल्पसंख्यांकाना पाठीशी घालण्यासाठी या घटनांमागे हिंदूच असल्याचा आभास निर्माण केला जात आहे, असा आरोप श्री. वेलिंगकर यांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कवेश गोसावी याचे अद्याप "ब्रेन मॅपिंग' झाले नाही. कवेश याच्या जबानीत इतरांची नावे आली आहेत त्याबाबतही पोलिस अद्याप गप्प आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून अर्धवट वक्तव्ये करून लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी मंदिर सुरक्षा समितीतर्फे पुकारण्यात आलेला गोवा बंद व त्यानंतर गेल्या १० जानेवारी २००८ रोजी पणजीत भरवण्यात आलेले विराट मंदिर संरक्षण संमेलन यामुळे आता समितीने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या विरोधात जागृती मोहीम हाती घेतल्यास त्याचे परिणाम कॉंग्रेसच्या मतांवर होतील, यामुळे आता समितीच्या नेत्यांमागे कारवाईचा ससेमिरा सुरू करण्याची तयारी सरकारने चालवली आहे.

No comments: