Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 30 March, 2009

विदेशी बॅंकांमधील भारतीयांचा पैसा स्वदेशी आणा - अडवाणी

नवी दिल्ली, दि. २९ - भारतीयांनी विदेशी बॅंकांत जो पैसा जमा केला आहे तो भारतात आणण्याचे प्रयत्न सरकारने करावे, अशी आग्रही मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली आहे. लंडन येथे होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेत हा मुद्दा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी उपस्थित करावा, असेही अडवाणी यांनी म्हटले आहे.
केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील "रालोआ' सरकार सत्तेवर आले तर आम्ही भारतीयांचा हा पैसा भारतात जरूर आणू, असे आश्वासन अडवाणी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिले. लंडन येथे होणाऱ्या जी-२० च्या शिखर परिषदेत पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी हा मुद्दा जरूर उपस्थित करावा. तसेच विविध देशांमधील बॅंकांमध्ये भारतीयांनी जमा केलेल्या पैशासंदर्भात संबंधित देशांनी भारतास माहिती द्यावी, अशी मागणी करावी, असे अडवाणी यांनी म्हटले आहे. सरकार या मुद्यावर गप्प का, असा कळीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
लोेकसभा निवडणुकीत जनतेने जर भाजप नेतृत्वाखालील रालोआला सत्तेवर बसवले तर आम्ही हे प्रकरण कायदेशीर तसेच अंमलबजावणी पातळीवर हाताळून विदेशी बॅंकांत ज्या ज्या भारतीयांनी हा पैसा गुंतवला असेल त्यांनी तो भारतात आणून भारतीय बॅंकांत गुंतवावा, यासाठी प्रयत्न करू . जेणेकरून हा पैसा देश उभारणीच्या कार्यात उपयोगी पडू शकेल, असे अडवाणी म्हणाले.
याच मुद्यावर आपण पंतप्रधानांना पूर्वीच एक पत्र लिहिले असून त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भारतीयांप्रमाणेच चीन, रशिया आदी देशांच्या नागरिकांनी स्वतःकडील पैसा विदेशी बॅंकांत जमा केलेला आहे. याआधी हे देश या मुद्यावर फार चिंतित नव्हते. तथापि, आता तेही चिंतित झाले आहेत. त्यांनाही वाटते की आपल्याच नागरिकांचा एवढा प्रचंड पैसा मायदेशी यावा. तो विदेशात गुंतून राहावा ही बाब देशाच्या दृष्टीने योग्य नाही. रालोआ सत्तेवर आल्यास आम्ही हा मुद्दा गंभीरपणे हाताळू, असे अडवाणी यांनी सांगितले.
स्विस बॅंकांमध्ये भारतीयांनी प्रचंड प्रमाणावर पैसा व धन जमा केले आहे. हा मुद्दा आम्ही निवडणुकीत ठळकपणे मांडणार असून त्याचा समावेश जाहीरनाम्यात केला जाईल, अशी घोषणा रालोआचे निमंत्रक व जनता दल संयुक्तचे प्रमुखशरद यादव यांनी अलीकडेच केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर अडवाणींनीदेखील हा मुद्दा लावून धरला आहे.
अडवाणींच्या सल्ला नको : कॉंगे्रस
स्विस बॅंकेत जमा असलेला भारतीयांचा पैसा भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असा जो सल्ला अडवाणी दिल्याने हा घाव कॉंग्रेसच्या वर्मी बसला आहे. त्यामुळे असा सल्ला अडवाणी यांनी देण्याची गरज नाही, असे कॉंगेसने म्हटले आहे.
केंद्रात गृहमंत्री व उपपंतप्रधान असताना या पैशासंदर्भात अडवाणी यांनी चौकशी का केली नाही, असा सवाल कॉंगे्रसचे नेते कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. ऐन निवडणुकीच्या काळात हा मुद्दा ते का उपस्थित करीत आहेत, हे अनाकलनीय असल्याचे सिब्बल यांनी सांगितले.

स्विस बॅंकांमध्ये भारतीयांचे ७२ लाख, ८० हजार कोटी

स्विस बॅंकांत पैसा गुंतवणाऱ्यांत भारतीय आघाडीवर असून त्यांची ही गुंतवणूक १,४५६ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी म्हणजे ७२ लाख ८० हजार कोटी रुपये एवढी अवाढव्य आहे. भारतीयांपाठोपाठ रशिया (४७० अब्ज डॉलर), ब्रिटन (३९० अब्ज डॉलर), युक्रेन (१०० अब्ज डॉलर) व चीन (९६ अब्ज डॉलर) या देशांचा क्रम लागतो.
स्विस बॅंकांमध्ये भारतीयांनी जो पैसा गुंतवला आहे ती रक्कम भारतावर असलेल्या परकीय कर्जाच्या तेरा पट व देशाच्या अर्थसंकल्पाच्या आठ पट आहे. ही रक्कम भारतात आणली तर देशावर असलेले सगळे परकीय कर्ज फेडूनही परकीय चलनाची मोठी गंगाजवळी शिल्लक उरेल. या पैशातून देशभरात जागतिक दर्जाचे गुळगुळीत रस्ते तयार होऊ शकतात. तसेच देशातील सहा लाख खेड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघू शकतो. एवढेच नव्हे तर स्विस बॅंकेतील हा पैसा भारतात वाटून देण्याचे ठरवले तर प्रत्येकाला एक-एक लाख रुपये मिळतील. आता बोला..!

No comments: