Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 31 March, 2009

चर्चिल समर्थकांचे आज शक्तिप्रदर्शन

"त्या' नेत्यांची नावे उघड करणार
मडगाव, दि. ३० (प्रतिनिधी) : कॉंग्रेसने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी फ्रान्सिस सार्दिन यांनाच उमेदवारी दिल्यामुळे आपली कन्या वालंका हिला उमेदवारी मिळवून देण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. आपली भूमिका स्पष्ट करणे व वालंकाला डावलण्याची शिफारस करणाऱ्यांची नावे उघड करण्यासाठी चर्चिल यांनी मंगळवारी सायंकाळी ४ वा. येथील लोहिया मैदानावर आपल्या समर्थकांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे. एक प्रकारे चर्चिल शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे मानले जात आहे.
दक्षिण गोव्याच्या विविध भागातून चर्चिल यांचे सुमारे पाच हजार समर्थक या मेळाव्यास हजर राहणार आहेत. चर्चिल यांनी, वालंकाचा पत्ता कापण्यात राज्यातील दोन प्रमुख कॉंग्रेस नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. या नेत्यांची नावे या मेळाव्यात उघड केली जाणार असून त्यांनी कशा पद्धतीने वालंकाच्या विरोधात काम केले याची माहिती चर्चिल देणार आहेत.
वालंकाला उमेदवारी मिळावी म्हणून लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यापासून चर्चिल यांनी दिल्लीत अथक प्रयत्न चालविले होते, गेल्या महिनाभरापासून ते तिथेच तळ ठोकून होते. चर्चिल यांच्या मते वालंकाला यावेळी उमेदवारी देणे ही कॉंग्रेसची जबाबदारी होती. सेव्ह गोवा कॉंग्रेसमध्ये विलीन करताना झालेल्या करारात ही अट कॉंग्रेसने मान्य केली होती, ती पूर्ण करणे हे त्या पक्षाचे कर्तव्य होते. वालंकाला तिकीट मिळवून देण्यासाठी आपण बांधकाम खाते किंवा मंत्रिपद सोडण्याचा प्रश्र्नच येत नाही, कारण या उमेदवारीचा व मंत्रिपदाचा काहीच परस्पर संबंध नाही, असे चर्चिल यांचे म्हणणे आहे.
वालंकाचा पत्ता कापण्यासाठी वावरणाऱ्यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार देताना केवळ एक दिवस धीर धरण्याचे आवाहन केले. चर्चिल यांनी पुढील कृती काय असेल यावर भाष्य करणे टाळले. चर्चिल यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेष्ठी वालंकाला तिकीट देण्यास अनुकूल होते पण राज्यातील काही नेत्यांनी सार्दिन यांच्या फेरनियुक्तीला पाठिंबा दिल्याने वालंकाचे नाव मागे पडले, असेही ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर गोव्यातील साऱ्या राजकीय मंडळीचे लक्ष चर्चिल यांच्या मेळाव्याकडे लागून राहिले आहे. परंतु, राजकीय पंडितांच्या मते चर्चिल उद्या कोणतेच धाडसी पाऊल उचलणार नाहीत. त्याऐवजी चर्चिल लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहतील व निवडणूक निकालानंतर दिल्लीतील चित्र कसे असेल ते पाहूनच आपली पुढील कृती ठरवतील.

No comments: