Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 February, 2009

भारताच्या पुराव्यांवर पाकचे पुन्हा प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली, दि. १ - कुठल्याही चौकशी यंत्रणेकडून गुन्ह्याची चौकशी ज्या पद्धतीने व्हावी त्याच पद्धतीने पाकिस्तानकडून मुंबई दहशतवादी हल्ल्याची चौकशी होत असून भारताने दिलेल्या पुराव्यांवर पाकिस्तानने काही पृच्छा केली असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी सूत्राने दिली. पाकिस्तानने दोन वेगवेगळ्या संचात पाठवलेल्या प्रश्नावलींपैकी एका प्रश्नावलीची उत्तरे भारताने पाठविलीही आहेत, अशीही माहिती या सूत्राने दिली.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांनी, माझ्या माहितीनुसार भारताकडील पुरावे प्राप्त होताच पाक सरकारने त्यावर आम्हाला असंख्य प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांची सर्व उत्तरे त्यांना पाठविण्यात आली, असे सीएनएन-आयबीएन वाहिनीवरील करण थापर यांच्या "डेव्हिल्स ऍडव्होकेट' या कार्यक्रमात बोलताना सांगितले. पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चयुक्त वाजिद शमसूल हसन यांनी त्यांच्या नुकत्याच दिलेल्या वक्तव्यात, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानी भूमिवर शिजला नाही, असे म्हटले होते. वाजिद यांच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नारायणन यांनी वरील माहिती दिली.
दुसऱ्या संचात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना अजून प्राप्त झाली नसावीत असे मला वाटते. त्यामुळे पाकिस्तानचे उच्चायुक्त लंडनमध्ये कशाबद्दल बोलताहेत हे मी सांगू शकत नाही. त्यादेशात असंख्य बाबतीत बेबंदशाही आहे. तशीच याही बाबतीत ती असू शकते एवढेच मला म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया नारायणन यांनी दिली.
भारताच्या पुराव्यांवरील पाकिस्तानी प्रतिक्रियेबद्दल तुम्ही समाधानी आहात काय या प्रश्नावर बोलताना, "समाधान' या शब्दाचा नेमका अर्थ मला कळत नाही परंतु ते नक्कीच गांभिर्याने वागत आहेत असे वाटते. कुठल्याही चौकशी यंत्रणेने ज्या पद्धतीने तपास पुढे न्यावा त्याचप्रमाणे ते तपास करित आहेत. दिलेल्या माहितीची पडताळणी आणि शहानिशा करणे, पुराव्यांवर प्रश्न उपस्थित करणे, ही गांभिर्याने चौकशी करण्याची लक्षणे आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे आमच्यादृष्टीने पाकने प्रश्न उपस्थित करणे, ही खुशखबर आहे. परंतु हे सर्व सोपस्कार झाल्यावर, त्यांच्याच श्रीमुखात हाणणारे सत्य ते स्वीकातील काय हे मला माहित नाही.

नारायण यांच्या वक्तव्याने गोंधळ :
मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या भारताने पाकला दिलेल्या पुराव्यांवर पाकने काही पृच्छा केल्याच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांच्या गौप्यस्फोटामुळे गोंधळ उडाला आहे. कारण, पाककडून काहीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसल्याच्या आपल्या विधानावर परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी ठाम आहेत.

No comments: