Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 February, 2009

मुंबई हल्ला प्रकरण पाकिस्तानची खुमखुमी अजूनही कायम : प्रणव

- कारवाईचे "नाटक' वठवले
- संभ्रम निर्मितीचा प्रयत्न
- वक्तव्यांत एकवाक्यता नाही

नवी दिल्ली, दि. ३१ : मुंबई हल्ल्यांसंदर्भात भारताने सादर केलेल्या पुराव्यांबाबत त्या देशाकडून अधिकृतपणे अद्याप आम्हाला कोणतीही माहिती न मिळाल्याचा स्पष्ट खुलासा परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज येथे केला. त्यामुळे याप्रकरणी पाकिस्तानची खुमखुमी अजूनही कायम असल्याचे व तो देश भारताच्या संयमाची "परीक्षा' घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आम्ही याबाबत अंतर्गत चौकशी पूर्ण केल्याचे प्रतिपादन पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले आहे.गेल्या गुरुवारी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्याकडे पाकिस्तानातील अंतर्गत चौकशीचा तपशील त्यांना सादर करण्यात आल्याचा दावा कुरेशी यांनी केला आहे. मात्र, त्यात अजिबात तथ्य नसल्याचा जाहीर खुलासा मुखर्जी यांनी केल्यामुळे पाकिस्तानची दुटप्पी नीती नव्याने उजेडात आली आहे.
या मुद्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी, राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी हेही दिशाभूल करणारी विधाने करत आहेत.
त्याचबरोबर पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चायुक्त वाहिद शमसुल हसन यांनी तर मुंबईवरील हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजलाच नव्हता, तो अन्य कोठे तरी रचला गेला असावा, असे धक्कादायक विधान करून आणखी गोंधळ उडवून दिला आहे. त्यावर गिलानी यांनी, अशा स्वरूपाचे वक्तव्य करण्याचा अधिकारच हसन यांना नसल्याचे म्हटले आहे. म्हणजेच सातत्याने या महत्त्वाच्या मुद्यावर वेगवेगळी वक्तव्ये करून भारताच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा डाव पाकिस्तानने टाकल्याचे दिसून येते. प्रणव मुखर्जी यांच्या स्पष्ट निवेदनामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या कटामागे आयएसआय या पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर संघटनेचा हात असल्याचे उजेडात येऊ नये यादृष्टीनेच पाकिस्तानची नव्याने धडपड सुरू झाली आहे. मुंबईवरील हल्ल्यांसंदर्भात भारताने पाकिस्तानकडे पुरेसे पुरावे सादर केले आहेत. त्यानंतर संबंधित अतिरेक्यांची धरपकड करण्यात आल्याचे नाटक काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने बेमालुमपणे वठवले होते. तसेच तपासकामी भारतीय तपास यंत्रणांचे सहकार्य घेण्याचे व भारताला साहाय्य करण्याचा साळसुद आव पाकिस्तानने आणला होता. कारण त्या काळात पाकवर युरोपीय देश आणि अमेरिकेकडून प्रचंड दबाव आणण्यात आला होता. तथापि, या दबावाचा पिळ किंचित ढिला झाल्यानंतर पाकिस्तानची गाडी पुन्हा पूर्वपदावर आल्याचे दिसून येते. या महत्त्वाच्या मुद्यावर पाकिस्तानचे तळ्यातमळ्यात सुरू झाले आहे. मुखर्जी यांनी संतप्त सुरात केलेले निवेदन म्हणजे त्याचेच निदर्शक ठरले आहे.

No comments: