Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 5 February, 2009

...अन्यथा मुख्यमंत्रिपदावर गदा येईल

बायंगिणी कचरा प्रश्नी मडकईकरांचा इशारा
विधानसभेवर हजारोंच्या संख्येने मोर्चा
मोर्चात तीन सत्ताधारी गटाचे आमदार
१८ जणांना अटक


पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - बायंगिणी जुने गोवा येथे कचरा प्रकल्प उभारण्यास पणजी महापालिकेला देण्यात आलेला भूखंड परत द्यावा अन्यथा दिगंबर कामत यांच्या मुख्यमंत्रिपदावर गदा येईल असा इशारा आज विधानसभेवर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी दिला. तसेच या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देऊन नागरिकांच्या मागण्या मान्य न झाल्यास खुर्चीवरून कोणाला खाली खेचावे, हे आम्हांला पुरेपूर माहीत आहे, असे यावेळी प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर म्हणाले. तर, सान्ताक्रुजच्या आमदार व्हिक्टोरीया फर्नांडिस यांनी आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हा लढा सुरू ठेवणार असल्याचे घोषित केले. ""या लोकप्रतिनिधींनी जगद्गुरूंचा अपमान केला आहे. या सरकारला धर्मांची भाषा कळत नाही. आम्ही गोव्यापुरतेच मर्यादित नसून याठिकाणी कचरा प्रकल्प उभा राहिल्यास १८ राज्यांत त्याचे पडसाद उमटतील'' असा झणझणीत इशारा नाणीज मठाच्या कोकण प्रांताचे प्रतिनिधी संजय मांगेलकर यांनी दिला.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार कृष्णा कुट्टीकर, सौ. जेनीता पांडुरंग मडकईकर, फा. कॉसेसांव, फा. मेरव्हिक, प्रजल साखरदांडे, संजय मांगेलकर उपस्थित होते. यावेळी हजारोंच्या संख्येने जमाव जमला होता. यात नाणीजच्या नरेंद्र महाराजांच्या भक्तांची संख्या उल्लेखनीय होती.
जाहीर सभेनंतर विधानसभेवर चाल करून जाणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. या मोर्चात भाग घेतलेल्या अठरा जणांना अटक करून वैयक्तिक हमीवर सुटका केली. यावेळी पोलिसांनी या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या सत्ताधारी गटातील तिन्ही आमदारांना अटक करण्याचे धाडस केले नाही.
बायंगिणी येथे कचरा प्रकल्प उभारण्याच्या मागे एक मोठे रॅकेट कार्यरत आहे आणि हेच रॅकेट कामत यांचे सरकार चालवते. योग्य वेळ येताच या रॅकेटचा आम्ही भांडाफोड करू, असा गौप्यस्फोट यावेळी श्री. मडकईकर यांनी केला. मुख्यमंत्री कामत यांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास कोणताही रस नाही. सरकारने या प्रश्नावरून गेल्या दोन वर्षांपासून जुने गोव्यातील जनतेला फसवले आले आहे. त्यामुळे माझा या सरकारवर विश्वास नाही. कामत हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात आंदोलने, मोर्चा हे प्रकार वाढले आहे, असे यावेळी श्री. मडकईकर म्हणाले. लोकसभा निवडणूक जवळ असल्याने तात्पुरती ही जागा मागे घेण्याचे नाटक हे सरकार करेल. परंतु भूखंड ताब्यात घेतल्याची प्रक्रियाच मागे घेतली जात नाही आणि याठिकाणी प्रकल्प होणार नाही, अशी लेखी हमी दिली जात नाही तोवर आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे श्री. मडकईकर शेवटी म्हणाले.
बायंगिणीच्या ग्रामस्थांवर हा कचरा प्रकल्प लादलेला आहे. मुख्यमंत्री हे कोणाच्यातरी दबावाला बळी पडत आहे. हा प्रकल्प येथे झाल्यास कोणाला खुर्चीवर खाली खेचावे हे आम्हांला पुरेपूर माहीत आहे, असे यावेळी आमदार ढवळीकर म्हणाले.
या विधानसभेत असलेल्या एकमेव महिला प्रतिनिधीला या सरकारला न्याय देता आला नाही. ते सरकार आम्हांला काय न्याय देईल. त्यामुळे हा प्रश्न आम्हांलाच सोडवावा लागेल, असे नाणीज मठाचे मांगेलकर म्हणाले. हे सरकार केवळ संगीत खुर्चीचे राजकारण खेळण्यात दंग आहे. उद्यापर्यंत हा भूखंड मागे न घेतल्यास प्रत्येक मतदारसंघातील आमदारांना त्यांच्या राहत्या ठिकाणी घेराव घाला, ही गुरु आज्ञा असल्याचे यावेळी श्री. मांगेलकर यांनी सांगितले. यावेळी साखरदांडे, फा. कॉसेसांव यांची भाषणे झाली.

विधानसभा सुरू असल्याने या परिसरात १४४ कलम लावण्यात आले आहे. दुपारी ही जाहीर सभा सुरू होण्याच्या पाच मिनिटापूर्वीही त्याठिकाणी लाऊडस्पिकर लावून सभा घेण्यास परवानगी नव्हती, असे यावेळी तिसवाडी तालुक्याचे संयुक्त मामलेदार सुधीर केरकर यांनी सांगितले. परंतु, कोणतीही हरकत न घेता याठिकाणी लाऊडस्पिकर लावून जाहीर सभा घेण्यात आली.

No comments: