Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 February, 2009

सरकारला भाजप कोंडीत पकडणार

विधानसभा अधिवेशन उद्यापासून
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): सोमवार २ फेब्रुवारीपासून विधानसभा अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेशन केवळ पाच दिवसांचे असले तरी त्याचा पुरेपूर फायदा उठवून सरकारला पूर्णपणे नामोहरम करण्याची व्यूहरचना विरोधी भाजपने केल्याने अधिवेशन रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोमवार २ रोजी राज्यपाल एस.एस.सिद्धू यांचे अभिभाषण होणार आहे.यंदा पहिल्यांदाच राज्यपालांचे स्वागत मुख्यमंत्री,सभापती व विरोधी पक्ष नेते करणार आहेत. राज्यपाल श्री.सिद्धु यांनी अद्याप निःपक्षपातीपणे आपली भूमिका वठवल्याने त्यांच्या भाषणात व्यतय आणण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पर्रीकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून सकाळी साडेअकरा वाजता प्रश्नोत्तर व शून्य प्रहराचा तास होईल व नंतर थेट तीन वाजता चर्चेला सुरुवात होईल. अधिवेशनाचा काळ कमी झाल्याने व चर्चेसाठी प्रश्न अधिक असल्याने अधिवेशन रात्री उशिरापर्यंत सुरू राहते व त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत असल्याने विरोधी भाजपने सकाळच्या वेळेचा वापर करण्याची मागणी यावेळी मान्य करण्यात आली आहे.
विद्यमान कॉंग्रेस सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरल्याचा आरोप करून या अधिवेशनात अनेक भानगडी उघड करण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे; तर जनतेसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना व विकासकामांची माहिती या अधिवेशनानिमित्ताने लोकांपर्यंत पोहचवण्याचे सरकारने ठरवले आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व कदंब महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांच्यावरील अपात्रता याचिका,पांडुरंग मडकईकर यांच्या मंत्रिपदाचा मुद्दा,कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मतभेद आदी विविध विषयांमुळे एक वेगळीच उत्सुकता लोकांना लागून राहिली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन भरवण्यात येत असल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.सरकारच्या बेपर्वाईमुळे राज्यावर भीषण आर्थिक संकट ओढवण्याची भीती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी वर्तविली असून येत्या अधिवेशनात त्याचा उलगडा करून दाखवण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे सरकारची विलक्षण गोची होण्याची शक्यता आहे.

No comments: