Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 5 February, 2009

"वास्कोवासीयांना गृहीत धरल्यास रस्त्यावर उतरू'

पर्रीकरांचा एमपीटीला खणखणीत इशारा
पणजी,दि.४ (प्रतिनिधी) - मुरगाव पोर्ट ट्रस्टकडून वास्कोवासीयांना गृहीत धरले जात आहे. पोर्टकडून स्थानिकांचा जो छळ सुरू आहे तो अजिबात सहन केला जाणार नाही.खारीवाडा येथील स्थानिक लोकांचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी या लोकांबरोबर आपणही रस्त्यावर उतरू,असा गर्भीत इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज विधानसभेत दिला.
आज राज्य विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन ठरावावर बोलताना सुमारे दीड तासांच्या "मॅरेथॉन' भाषणांत पर्रीकरांनी सरकारच्या कार्यपद्धतीच्या चिंधड्या उडवल्या. आपण थेट केंद्र सरकारला बांधील आहोत अशी अरेरावीची भाषा करणाऱ्या "एमपीटी'अध्यक्षांना हटवण्याची गरज आहे. केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यास त्यांची बदली करण्याची जबाबदारी आपण घेतो,असे पर्रीकर म्हणाले. दरम्यान,"एमपीटी'अध्यक्षांकडून मुख्यमंत्र्यांवर टीकाटीप्पणी करण्याच्या प्रकारावरही पर्रीकरांनी नाराजी व्यक्त केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा अधिकार त्यांना नाही. "एमपीटीने' चालवलेल्या हालचालींवरून त्यांनी स्थानिकांवर गदा आणण्याचे षडयंत्र रचले असून त्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे,असे पर्रीकर म्हणाले.
सरकारचा प्रशासनावरील ताबा पूर्णपणे गेल्याने सरकारप्रती जनतेची विश्वासाहर्ताच गेल्याचे पर्रीकर म्हणाले.कायदा सुव्यवस्थेची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे व त्यामुळे राज्याची राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.सरकार पक्षातीलच आमदार आपल्याच सरकारविरोधात मोर्चे काढतात हे चित्रच या सरकारची अवस्था स्पष्ट करणारे आहे,असा टोलाही पर्रीकर यांनी हाणला.
स्थलांतरीतांचे लोंढे गोव्यात येत आहेत.गेल्या वर्षी सुमारे २० हजार लोक गोव्यात आल्याची आकडीवारी सादर करून हा लोंढा रोखला नाही तर भविष्यात गोव्याचे अस्तित्व धोक्यात येईल,असे त्यांनी सांगितले.आदिवासी आराखड्यातील पैशांचा केवळ १५ टक्के विनियोग करण्यात आल्याने सरकार या लोकांची थट्टा करते की काय,असा सवालही त्यांनी विचारला.पालिका,पंचायत व जिल्हा पंचायत सदस्यांना नोकरांप्रमाणे वागणूक मिळत आहे.खर्चावर अजिबात नियंत्रण नाही.विविध मंत्र्यांच्या खाजगी खर्चावरही सरकारी पैसा वापरण्याची कृतीही आक्षेपार्ह असल्याचे पर्रीकर म्हणाले.बेकायदा खाण व्यवसायाला तर उत आला आहे व त्यात वन खात्याकडून सर्रासपणे खाण व्यवसायिकांवर कृपादृष्टी सुरू असल्याने धोका अधिक वाढला आहे, असे पर्रीकर म्हणाले.
बंदर कप्तानाला बडतर्फ करा
खोटारडेपणा कसा करावा याचे धडे बंदर कप्तानांकडून गिरवा,असे सांगून "कॅसिनो रॉयल' या जहाजाला परवाना देताना त्यांनी केलेल्या भानगडी आज पर्रीकरांनी सभागृहात उघड केल्या. या अधिकाऱ्याला निलंबित करून बडतर्फ करण्याइतपत पुरावे आहेत,असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.कॅसिनोवर जाणाऱ्या लोकांत ६५ टक्के हे स्थानिक आहेत,असे सांगून या जुगारामुळे मिळणाऱ्या महसुलापेक्षा त्याचे दुष्परिणाम अधिक धोकादायक असल्याचे पर्रीकर म्हणाले.कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण न करताच कॅसिनोला परवाना दिल्याने सुमारे ४२ लाख रूपयांचे नुकसान बंदर कप्तानाकडून वसूल करून घ्यावे,अशी मागणी पर्रीकर यांनी केली.कॅसिनो जहाजांमुळे मांडवीच्या प्रदूषणातही वाढ होत असून सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही,असा आरोप पर्रीकरांनी केला.

No comments: