Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 3 February, 2009

राज्यात कायदा, सुव्यवस्था नियंत्रणाखाली : राज्यपाल

पणजी, दि.२ (प्रतिनिधी) : मावळत्या वर्षात (२००८) राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे नियंत्रणात राहिल्याने गंभीर स्वरूपाचा एकही प्रकार घडला नाही,असे प्रतिपादन राज्यपाल डॉ. एस.एस.सिद्धू यांनी आज आपल्या पहिल्या अभिभाषणात करून सगळ्यांनाच चक्रावून टाकले. विशेष म्हणजे गेल्या वर्षी राज्यात सुरू असलेल्या चोऱ्यांचा सुळसुळाट, मंदिर तोडफोड व मूर्तिभंजनाचे वाढते प्रकार, तलवारी साठा प्रकरण, म्हादई, सोनसोडो कचरा प्रकल्प आदींचा पुसट उल्लेखही अभिभाषणात नव्हता. राज्य विधानसभेचे यंदाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले. २ ते ६ फेब्रुवारी या दरम्यान चालणाऱ्या या अधिवेशनाचा आरंभ राज्यपालांच्या झाला. सभापती प्रतापसिंग राणे यांच्यासह मुख्यमंत्री दिगंबर कामत व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी राज्यपालांचे विधानसभेच्या प्रवेशव्दारावर स्वागत केले. यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली.नंतर त्यांना सन्मानाने विधानसभा सभागृहात आसनारूढ करण्यात आले. राज्यपालांचे अभिभाषण हे सरकारकडूनच तयार केले जाते. त्यामुळे त्यात सरकारच्या निष्क्रियतेवर पडदा पडणे स्वाभाविक होते. राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे नियंत्रणात राहिल्याचे सांगत असताना गेल्या वर्षी भारतीय दंड संहितेअंतर्गत एकूण २४७२ गुन्हा प्रकरणे नोंद होऊन त्यातील १८१६ प्रकरणांचा छडा लावल्याची माहिती देण्यात आली. रस्ता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी २,४७,४५५ जणांना चलन,५८२ मटका प्रकरणे नोंद करून ३.७० लाख रोकड जप्त,१७ अमलीपदार्थसंबंधित प्रकरणे नोंद करून त्यात २० जणांना अटक व ७२.८४ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
सरकारच्या कार्याची स्तुती करताना अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत २००७-१२ या काळात १२.१ टक्के विकासदर निश्चित करण्यात आला आहे. गोव्याला एक आदर्श राज्य बनण्याची संधी नक्कीच आहे. सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
कृषी क्षेत्रात यंदा राज्य व तालुका पातळीवर उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार जाहीर करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सरकारने सुरू केले.जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष योजना,कामधेनू योजनेला चालना आदींचा उल्लेख करून पडीक शेतजमिनीत कृषी उत्पादन करण्यासाठी ५० टक्के अनुदान देण्याची योजनाही आखली जात असल्याची माहिती राज्यपालांनी दिली.
मत्स्य निर्यातीव्दारे यंदा सरकारला ८८.४९ कोटी रुपयांचे विदेशी चलन प्राप्त झाले.गोवा सहकार कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून सहकारी पतसंस्थांची थकबाकी वसूल करण्यासाठी खास एकरकमी कर्ज योजना तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.साळावली जलसंसाधन प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने १४,१०६ हेक्टर जमीन ओलिताखाली आली असून २८ जलवापर संघटना स्थापन करण्यात आल्याचे ते म्हणाले.तिळारी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून मे २०१० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल,अशी माहिती त्यांनी दिली.स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा आर्थिक विकास महामंडळ व खादी व ग्रामोद्याग मंडळामार्फत विविध योजना राबवण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटक व दारीद्र्यरेषेखालील लोकांसाठी विविध योजना राबवण्यात येतात.६९४७ कुटुंबांना दारिद्र्यरेषेखालील यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यांना स्वयंरोजगार व निवाऱ्याची सोय करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही सांगण्यात आले.दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत १,०३,६३२ लाभार्थींची नोंद झाली असून त्यांना प्रतिमहिना १२०० रुपये देण्यात येतात,असेही राज्यपाल म्हणाले.आरोग्य,वाहतूक,महिला व बालकल्याण,सार्वजनिक बांधकाम खाते,कला व संस्कृती, क्रीडा आदी विविध खात्यांचा विशेष उल्लेख करून या अंतर्गत सुरू असलेली विकासकामे व विविध योजनांची माहिती त्यांनी अभिभाषणात दिली.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys