Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 February, 2009

धारगळच्या क्रीडा नगरीला शेतकऱ्यांचा कडवा विरोध

सरकारविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा
मोरजी, दि. ३१ (वार्ताहर) : धारगळ येथील नियोजित क्रीडा नगरीतून शेतजमिन व आंबाबागायती वगळली नाही तर सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धारगळ क्रीडानगरी विरोधी जमीन बचाव समितीने दिला आहे.
या नगरीच्या नियोजित जागेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी, आंबा, काजू कोकम, फणस, सागवान अशा प्रकारची झाडे लावलेल्या जमिनींची पाहणी आज पणजी व स्थानिक पत्रकारांनी शेतकऱ्यांसोबत केली.
ही झाडे लावण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागले याची सविस्तर माहिती देताना कुठल्याही परिस्थितीत शेतजमीन व आम्राबागायती नगरीसाठी सरकारला संपादू देणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या धारगळ क्रीडानगरी विरोधी जमीन बचाव समितीद्वारे देण्यात आला.
येथील शेतकरी धोंडू परब, दुर्गादास परब, आपा परब, कृष्णनाथ परब, धोंडू पटेकर, प्रकाश पाळयेकर, गौरी परब, सोमनाथ परब, प्रदीप परब, अनिल परब व संतोष परब यांनी पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. १५० कुटुंबे या आम्रबागायतीवर अवलंबून आहेत. पालये, आशेलबाग, व विर्नोडा, दाडाचीवाडी, पालये, ओशेलबाग व विर्नोडा या भागातील शेतकऱ्यांनी डोंगर माथ्यावर सायकलीला पाण्याच्या घागरी बांधून पाणी नेले व झाडे फुलवली. त्यात ५ लाख चौरस मीटर जागेत ही झाडे असून ही जागा सरकारने वगळावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. पावसाळ्यात याठिकाणी भात शेती, नाचणी, मुग, भुईमूग आदी पिकांचे उत्पन्न घेतले जाते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
पाणी अडवा, पाणी जिरवा या योजनेद्वारे ओहळाला बांध घालून पाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरम्यान या भागातून जी बागायत आहे त्याला जवळूनच तिलारी प्रकल्पाचा कालवा अडीच किलोमीटर लांबपर्यंत गेला आहे. आता तिळारीचे पाणी ऐन तोंडावर आले असताना सरकारने शेतजमिन मालकांना विश्वासात न घेता क्रीडा नगरीसाठी जागा जर संपादन करण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडला जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
खडकाळ जागेची पाहणी
क्रीडामंत्री बाबू आजगावकर व क्रीडा अधिकारी यांनी नियोजित जागेची पाहणी केली होती. त्यावेळी मंत्री व अधिकाऱ्यांनी आपल्या गाड्या ओसाड व खडकाळ भागात पार्क करून ही जागा योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. तथापि, त्यांनी आम्रबाग आणि मोठ्या प्रमाणात बागायती असलेली जागा दाखवली नाही. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी स्वत: या जागेला भेट देऊन नंतरच क्रीडा नगरी उभारण्याचा निर्णय घ्यावा, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
२१ लाख चौरस मीटर जागा
या क्रीडा नगरीसाठी २१ लाख चौरस मीटर जागा हवीच कशाला, असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित करून आजपर्यंत या नगरीत कोणते प्रकल्प कोणत्या प्रकारचे रोजगार याविषयी सरकारने माहिती दिलेली नाही. यावरून कुठेतरी काळेबरे असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त करून ऑलॉपिंकसाठी जर ६ लाख चौरस मीटर जागा पुरेशी ठरते तर क्रीडा नगरीसाठी २१ लाख चौरस मीटर जागेची आवश्यकता का, खडा असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.
शेतकऱ्यांनी यापूर्वी क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला असता ते आमची कैफियत ऐकून घेत नाहीत, असा दावा शेतकऱ्यांनी केला. सरकारला जर क्रीडा नगरी उभारायची असेल तर खडकाळ जमीन शेतकरी द्यायला तयार आहे. मात्र लागवडीखालील जमीन कोणत्याही स्थितीत दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.
सरपंच फिरकलेच नाही
क्रीडा नगरीसाठी पेडणे तालुक्यातील काही सरपंच, उपसरपंच, पंच, जिल्हा सदस्य व इतर मंडळी क्रीडा नगरीसाठी हातवारे करून पाठिंबा देतात. त्या जबाबदार लोकांनी जी झाडांची बागायत आहे त्या ठिकाणी येऊन जागेची पाहणी करावी व नंतरच पाठिंबा द्यावा. प्रत्यक्षात त्यांनी अजूनही त्या जागेची पाहणीच केलेली नाही. त्यांनी ती करावी, असे आवाहन फोरमने केले आहे. दरम्यान या बागायतीची पाहणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, खासदार श्रीपाद नाईक, आमदार दयानंद सोपटे व धारगळचे सरपंच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक यांनी केलेली आहे.
नागरिकांची बैठक
दरम्यान, धारगळ क्रीडा नगरी विरोधी जमीन बचाव समितीची महत्त्वाची बैठक राष्ट्रोळी मंदिर दाडाचीवाडी धारगळ येथे झाली. त्यावेळी पत्रकारांना माहिती देताना समितीतर्फे लेखी निवेदन मुख्यमंत्री क्रीडामंत्री क्रीडाखाते, विरोधी पक्षनेते, खासदार, पंचायत, उपजिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्री कामत यांनी अजूनपर्यंत या क्रीडा नगरीविषयी व जागा वगळण्याविषयी प्रतिक्रिया दिलेली नाही. यापुढे सरकारने जर जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर संबंधित जमीन मालकांना लेखी नोटीस येतील. त्यावेळी प्रथम धडक मोर्चा पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल, असे सांगितले. याप्रसंगी नवसो पालयेकर, मदन परब, चंद्रकांत नाईक, सावित्री पालयेकर, प्रकाश पालयेकर, दुर्गादास परब आदींनी आपले विचार मांडले.

No comments: