Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 6 February, 2009

...तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

रानटी हत्तींचा बंदोबस्त विफल
मोरजी, दि. ५ (वार्ताहर) - रानटी हत्तींचा बंदोबस्त केला नाही तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल, असा इशारा हसापूर पेडणे येथील नुकसानग्रस्त शेतकरी नामदेव नाईक यांनी दिला.
प्रशिक्षित हत्ती असूनही हसापूर भागातून आता रानटी हत्तीने दोन दिवस आपला मोर्चा खुटवळ भागात वळवला असून वायंगण शेती व भाताची उडवी फस्त करण्याचा प्रकार अजूनही हत्तींकडून होत असल्याने शेतकरी भयग्रस्त झालेले असून या हत्तींपासून आम्हाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
मागच्या चार दिवसांपूर्वी हसापूर भागात हत्तीने धुमाकूळ घातल्यानंतर आता आपला मोर्चा त्याने खुटवळ भागात ४ व ५ रोजी पहाटे वळवून चिपोली, कोळमाड या भागातील दिलीप म. हरिजन(भाताचे उडवे) प्रभाकर शं. नाईक, गुरुदास रामा सावंत, अंकुश रामचंद्र नाईक, नागेश सिताराम पंडित, मोहन नवसो नाईक, विजय अनंत च्यारी व नामदेव शंकर नाईक आदी शेतकऱ्यांची हत्तीने वायंगण शेती मोठ्या प्रमाणात हानी केली आहे.
५ रोजी पहाटे ३ वाजता कोलमाड खुटवळ भागात हत्तीने येऊन भाताची उडवी व वायंगणी शेतात नाचून मळणी घातली.
अंथरुण फेकले
नामदेव शंकर नाईक यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की आपण हसापूर भागाचा असून आपली खुटवळ चिपोली व कोळमाड या भागात मोठ्या प्रमाणात शेती आहे. रानटी जनावरांपासून भात शेताची राखण करण्यासाठी आपण चिपोली भागात गावापासून १० किलोमीटर दूर शेतावरच झोपडी उभारून त्या ठिकाणी झोपण्यासाठी उंच ठिकाणी एक जागा तयार केली आहे. भात शेताजवळ ही जागा असल्याने रात्रीचे जनावर आले तर कळते. आदल्या दिवशी या भागात हत्ती आला होता. दुसऱ्या रात्री हत्ती येऊन मनुष्यहानी करील या भयापोटी खुटवळ भागातील शेतकऱ्यांनी आपणांस त्या ठिकाणी रात्रीच्यावेळी झोपायला दिले नाही. ५ रोजी पहाटे हत्ती त्या ठिकाणी आला व अंथरूण जाग्यावर उडवले व त्यांच्या चिंधड्या केला. लोकांनी आपणास त्या रात्री या ठिकाणी झोपायला दिले नाही म्हणून आपण या हत्तीपासून वाचलो असून जर सरकारने या हत्तींचा बंदोबस्त केला नाहीतर आपणास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, नामदेव नाईक यांचा गोठा मागच्यावर्षी हत्तीने जमीनदोस्त केला होता. गेल्या वर्षीपासून या भागात प्रथमच रानटी हत्ती येत आहे. त्यामुळे आपण भयभीत झालो आहे. सरकारने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहे.
नुकसान भागाचा पंचनामा
वनखात्याचे अधिकारी अनिल शेटगांवकर, तुये वन विभागीय अधिकारी श्रीराम प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याचे कर्मचारी व्हील्स्न ब्रिटो यांनी नुकसान केलेल्या भात शेताचा पंचनामा केला.
प्रशिक्षित हत्ती तपास
रानटी हत्तींचा पाठलाग व शोध प्रशिक्षित हत्ती घेत आहेत. परंतु या प्रशिक्षित हत्तीला रानटी हत्ती चुकवून आज हसापूर उद्या खुटवळ व नंतर चांदेल असा आपला मोर्चा वळवत असल्याने वन खात्यालाही योग्य ती कारवाई करता येत नाही.
दरम्यान वनखात्याने या रानटी हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी बोंडला येथून दोन हत्ती व माहूत आणले आहेत. ते हसापूर भागात आहेत. या रानटी हत्तींचा ते शोध घेत असले तरी रानटी हत्ती त्यांना गुंगारा देत आहे.

No comments: