Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 7 September, 2008

सिंगूरप्रश्नी अखेर तोडगा

कोलकाता, दि. ७- पश्चिम बंगालचे राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्या पुढाकाराने आज झालेल्या बैठकीत राज्य सरकार व तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यात वादग्रस्त सिंगूर प्रकरणी तोडगा काढण्यात आल्याने टाटा कंपनीचा नॅनो प्रकल्प अन्यत्र हलविला जाणार नाही,अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आजची बैठक राजभवनावर दोन तास चालली आणि त्यात सर्वमान्य असा तोडगा काढण्यात आला, असे सांगण्यात आले.
आज निघालेल्या तोडग्यानुसार शेतकऱ्यांना पर्यायी जमीन दिली जाणार आहे याबाबत खास समिती ती निर्णय घेईल. सिंगूरमध्ये नॅनो प्रकल्पासाठी १५ अब्ज रुपयांच्या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर प्रथमच दोन नेत्यांनी एकत्रितपणे या विषयावर आज चर्चा केली. गेले काही दिवस टाटा कंपनीच्या छोट्या गाड्यांच्या निर्मिती प्रकल्पाबाबत वादाने शिखर गाठल्याने स्वतः रतन टाटांनी आपली नाराजी व्यक्त करीत आपला प्रकल्प अन्यत्र हलविण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे हे वृत्त आंतरराष्ट्रीय स्तरावरही झळकले. श्रीलंका सरकारने आपल्या देशात हा प्रकल्प सुरु करण्यासाठी टाटांना आमंत्रित केले.
नवी दिल्ली येथे बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी हा प्रकल्प पश्चिम बंगालमध्येच राहावा अशी पक्षाची इच्छा असल्याचे जाहीर निवेदन आज केले. सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची आज कोलकाता येथे बैठकीत मुख्यमंत्री भट्टाचार्य यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले होते.

No comments: