Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 February, 2008

लेखी हमीनंतरच आंदोलन मागे घेणार
वास्को, दि. 13 (प्रतिनिधी) - मुरगाव पोर्ट ट्रस्टचे चेअरमन प्रवीण अगरवाल यांनी मुरगाव बचाव अभियानाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यांनी काही मुद्दे वगळून अभियानाला पत्र दिले आहे. हे डावपेच मुरगाववासीय सहन करणार नाहीत. त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची लेखी हमी दिल्यानंतरच आंदोलन मागे घेतले जाईल,असे आज अभियनाने नेते रोनी डिसोझा यांनी सांगितले.
मुरगाव बचाव अभियानाने शहरात काढलेल्या भव्य मोर्चानंतर डिसोझा यांनी जाहीर सभेत हे निवेदन केले.
महसूल मंत्री जुझे फिलीप, उपसभापती माविन गुदिन्हो, आमदार मिलींद नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आज एमपीटीचे चेअरमन प्रवीण अगरवाल यांनी अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. त्यापैकी कोळशाचा चढउतार धक्का क्रमांक 10 व 11 वरुन 4 व 5 वर नेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेला या प्रदुषणाचा फटका बसणार नाही, तसेच शहरातून कोळसा वाहतूक केली जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्याचे डिसोझा यांनी उपस्थितांना सांगितले. चिखली अथवा वाडे येथे मच्छिमार जेटी बांधण्याचा एमपीटीचा बेत रद्द करण्यात आल्याचे अगरवाल यांनी सांगितले आहे. ज्यांची घरे महामार्गामुळे जाणार असतील, त्यांचे पुनर्वसन करण्याची ग्वाही अगरवाल यांनी दिली आहे.
या मेळाव्यात भाषण करताना सायमन परेरा यांनी लोकप्रतिनिधींनी व जनतेने लढ्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. जनतेला न्याय दिल्यावरच हा लढा थांबेल असे आश्वासन त्यांनी दिले.

No comments: