Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 August, 2008

मंदिरे शक्तिपीठे बनल्यासच सुरक्षा शक्य - ब्रह्मेशानंदाचार्य

पणजी, दि. 17 (प्रतिनिधी) - मंदिरातील मूर्ती या साक्षात देव असून तो आमचा आत्मा आहे. आत्म्याचे रक्षण करणे हे पाप आहे का?, देव श्रद्धेमध्ये आहे. जशी श्रद्धा तसे कार्य. आपणही वणवे पेटवू शकू, पण आम्हाला ते करावयाचे नाही. मंदिरात नुसते पुजारी येऊन पुजा करतात, असे संबंध ठेवू नका. संपूर्ण गावाला एकत्र करा, मंदिरातील कोणत्याही धार्मिक विधीला संपूर्ण गाव एकत्र आलाच पाहिजे. गावातील संपूर्ण तरुण पिढी मंदिरात शिरलीच पाहिजे. मंदिरांची सुरक्षा महत्त्वाची असून ही धर्मस्थळे येणाऱ्या काळात शक्तिपीठ व्हायला हवीत, असे प्रतिपादन प. पु. तपोभूमीचे पीठाधीश ब्रम्हेशानंदाचार्य स्वामी महाराजांनी आज अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीच्या महामेळाव्यात केले. पणजीतील मराठा समाज सभागृहात भूतपूर्व अशा प्रकारे पहिल्यांदाच गोव्यातील असंख्य देवस्थान समितीच्या सदस्यांनी भरलेल्या महामेळाव्यात प.पु. ब्रम्हेशानंदाचार्य स्वामी महाराज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पश्चिम भारत धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीचे निमंत्रक राजेंद्र वेलिंगकर, प्रा. अनिल सामंत, सनातन संस्थेचे डॉ. पांडुरंग मराठे, तपोभूमी मठाचे खजिनदार सुदेश नाईक, बजरंग दलाचे राज्य प्रमुख विनायक च्यारी, हिंदू जनजागृती समितीचे जयेश थळी तसेच अकराही तालुक्याचे समन्वयक यावेळी उपस्थित होते.
""आपल्या धर्मांत विकृती शिरणार नाही याची काळजी घेणे. मंदिरांची सुरक्षा ही आपली स्वतःची सुरक्षा आहे. लोक सहकार्य करतील की नाही, याची चिकित्सा करू नये. देवांना सांभाळण्यासाठी जेवढे आहे, तेवढे पुरे आहोत'', असे स्वामीजी म्हणाले. खचाखच भरलेले सभागृह पाहून आपला ऊर भरून आल्याचे स्वामीजीने सांगून या महामेळाव्यासाठी परिश्रम घेतलेल्यांचे अभिनंदन केले. सहाशेपेक्षा जास्त संख्या यावेळी उपस्थित होती. उत्सवाच्यावेळी मंदिरात पाश्चात संगीत वाजणार माही आणि नृत्य होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी यावेळी सर्व देवस्थान समित्यांना स्वामींजींनी आवाहन केले. यावेळी खुद्द स्वामीजींनी ""भारत माता की जय'' "" वंदे मातरम'' अशा जोरदार घोषणा देऊन संपूर्ण सभागृह दणाणून सोडला.
""भारतात हिंदू समाज मोठ्या वेगाने जागृत होत आहे. गोव्यात पोर्तुगिजांनी पाडलेल्या 450 मंदिरांपैकी 300 मंदिरे पुन्हा उभी राहिली आहेत. सरकार कोणाचे आहे, हा मुद्दा नाही. गोव्यातील जनता कशी आहे, हा मुद्दा आहे. जनतेला हवे तेच या सरकारला करावे लागणार आहे. या समितीचा कोणालाही विरोधा नाही. आजची सभा ही केवळ सुरुवात असून मंदिरे ही समाज सुधारण्याची जागृत घरे व्हावी, असे मत यावेळी पश्चिम भारत धर्म जागरण प्रमुख शरदराव ढोले यांनी व्यक्त केले.
अध्यात्म म्हणजे केवळ रुद्राक्षाची माळ जपणे नाही. आता एका हातात रुद्राक्षाची माळा आणि दुसऱ्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार घेण्याची गरज आहे. पूर्वजांनी चुका केल्यात त्यातून शिकले पाहिजे आणि पराक्रम केलेत त्यांतून प्रेरणा घेतली पाहिजे, असे यावेळी प्रा. अनिल सामंत बोलताना म्हणाले. सध्या कागदी अभ्यासक्रम शिकवणारी विद्यापीठे उभी राहिली आहेत. त्यात खारा इतिहास शिकवला जात नाही. इतिहासाच्या अभ्यासक्रमात छ. शिवाजी महाराज, क्रांतिकारी आणि संताचा लवलेशही नसतो. असला तर तोही चुकीचा, असे ते म्हणाले. आपली मंदिरे ही विद्यापीठ आणि विद्यालये होती. त्याठिकाणी नवे विचार दिले जात होते. मंदिरांच्या माध्यमातून विद्यालये चालत होती. त्या तोडल्या गेल्यात. आपल्या सर्व कला मंदिरातून सुरू झालेल्या आहेत. त्यात कोणताही भोगवाद नाही, असे ते शेवटी म्हणाले.
गोव्यात गेल्या काही वर्षापासून सुमारे 15 मंदिरांची नासधूस करण्यात आली. वेळोवेळी पोलिस स्थानकात तक्रारी करण्यात आल्यात. मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांनी निवेदने सादर करण्यात आली. मात्र एक गठ्ठा मतदानासाठी त्याकडे लक्ष पुरवण्यात आले नाही. त्यामुळेच ही समिती स्थापन करण्यात आली आहे, असे यावेळी बजरंग दलाचे प्रमुख विनायक च्यारी यांनी सांगितले. यापुढे हिंदूच्या मंदिरांकडे वाकड्या डोळ्यांनी पाहणाऱ्यांचे डोळे फोडले जातील, अशा रक्तरंजित इशारा यावेळी च्यारी यांनी बोलताना दिला. या समितीचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी केले.
गोव्यात पकडण्यात आलेला दहशतवादी बाटलू हा स्वतः खटला लढवून गोवा सरकारच्या नाकावर टिच्चून निर्दोष सुटू शकतो, ही लांच्छनास्पद गोष्ट आहे. गोवा दहशतवादापासून वंचित आहे, असे म्हणता येणार नाही. कोणत्याही कृतीला वेळीच प्रतिक्रिया दिली गेली पाहिजे, असे राजेंद्र वेलिंगकर यांनी सभेला उद्देशून सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात या समितीचे कार्य काय असणार आहे, याचा उलगडा यावेळी श्री. वेलिंगकर यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश थळी यांनी केले.
समितीचा निर्णय
मंदिरावर संकट आल्यास लगेच मंदिरात गोळा व्हावे.
तरुणांची शक्ती मंदिराकडे जोडली जावी.
मंदिरासाठी सुरक्षा पथक निर्माण व्हावे.
आरत्यांना भाविकांना गोळा करण्यासाठी शंख नाद करणे.
दसऱ्याला सामूहिक शस्त्रपूजन
हिंदूच्या सर्व देवदेवतांच्या हातात शस्त्र असल्याने आपल्या संरक्षणासाठी कायद्यात बसणारे एकतरी शस्त्र हिंदूने बाळगणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षापासून दसऱ्याच्या शुभमुहूर्ताला संपूर्ण गोव्यात सामूहिक शस्त्र पूजन केले जाणार आहे, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

No comments: