Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 21 August, 2008

असंतोष तीव्र होण्याची चिन्हे

हरिप्रसाद यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना खडसावले
पणजी, दि. 20 (प्रतिनिधी) - राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आहे,त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी काही प्रमाणात तडजोड सहन करावीच लागेल. अन्यथा त्यांच्यावर विरोधी बाकांवर बसण्याचा प्रसंग बसण्याची वेळ ओढवेल, असा जळजळीत इशारा कॉंग्रेसचे गोवा प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी दिला. या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेसमधील असंतोष येत्या काही दिवसांत आणखी उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आज प्रदेश कॉंग्रेस समितीची विशेष बैठक येथील गोवा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृहात आयोजित करण्यात आली होती. माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त कार्यकर्त्यांना खास मार्गदर्शन करण्यासाठी हरिप्रसाद यांना आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी प्रदेशाध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन तथा अन्य पदाधिकारी हजर होते. कॉंग्रेसचे आमदार तथा मंत्री पक्षाच्या बैठकांना व कार्यक्रमांना गैरहजर राहतात अशी तक्रार अनेक पदाधिकाऱ्यांनी केली. एकदा निवडून आल्यानंतर पक्षाकडे पाठ फिरवून हे नेते आपल्याच मतदारसंघाकडे लक्ष देतात, यामुळे पक्षाच्या कार्याला बाधा पोहोचते,अशी तक्रार यावेळी करण्यात आली. सरकारातील आमदार व मंत्र्यांकडून कार्यकर्त्यांची कामे केली जात नाहीत. त्यामुळे सत्ता असूनही त्याचा फायदा पक्ष संघटनेला करून देण्यासाठी कुणीच पुढाकार घेत नसल्याचेही अनेकांनी हरिप्रसाद यांच्या नजरेला आणून दिले. पाळी मतदारसंघाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. पाळी मतदारसंघाची उमेदवारी ही केवळ या मतदारसंघातील मतदार यादीवर नाव असलेल्या उमेदवारालाच देण्यात यावी,अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी पुढे केली. ही मागणी हरिप्रसाद यांनी मान्य केली असून पाळी मतदारसंघातीलच व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल,असेही आश्वासनही त्यांनी दिले.

No comments: