Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 21 August, 2008

जम्मूत पुन्हा संचारबंदी

जम्मू, दि.20 - अमरनाथ देवस्थान मंडळाला दिलेली वनजमीन परत घेण्याच्या मुद्यावरून जम्मूमध्ये काल रात्री पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक झाला. या हिंसाचारामुळे जम्मूमध्ये लष्कर तैनात करण्यात आले असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
अमरनाथ मुद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाची धग शमत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी काल दिले होते. मात्र, ताज्या घटनाक्रमात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळून आला. यामध्ये 9 पोलिस जवानांसह 40 जण जखमी झाले आहेत. तथापि, सांबा, उधमपूर, आणि किश्तवाड जिल्ह्यांमधील संचारबंदी वेगवेगळ्या वेळी शिथिल करण्यात आली.
""जम्मूमधील विविध भागात हिंसाचार उफाळून आला आणि संतप्त जमावाने पोलिस आणि लष्कराच्या जवानांवर तुफान दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी लाठीमार केला व अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या व रबरी गोळ्यांचा मारा देखील केला,''अशी माहिती पोलिसांनीच दिली.
अमरनाथ मुद्यावरून पुकारलेल्या तीन दिवसीय "जेलभरो आंदोलना'चा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. अमरनाथ संघर्ष समितीने या आंदोलनाचे आवाहन केले होते. संचारबंदी मोडली जाऊ नये, आंदोलकांना अटक करवून घेण्यापासून रोखावे, यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी तारांचे कुंपण उभारलेले आहे.
सांबामध्ये पहाटे 5 वाजतापासून 9 तासांसाठी, उधमपूरमध्ये पहाटे 5 वाजतापासून 5 तासांसाठी आणि किश्तवाडमध्ये सकाळी 7 वाजतापासून 5 तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. गेल्या 24 तासांत काश्मीर खोऱ्यात अत्यावश्यक वस्तू आणि फळे आणि भाज्या आणण्यासाठी 1200 पेक्षा जास्त वाहनांची मदत घेतली जात आहे, असेही पोलिसांनीच सांगितले.

No comments: