Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 August, 2008

आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन

अंतर्गत कलह सरकारच्या मुळावर?
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) ः सरकारांतर्ग संघर्ष आणि इतर अनेक कारणांनी वादग्रस्त ठरण्याचे संकेत असलेले राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून हे अधिवेशन म्हणजे दिगंबर कामत यांची अग्निपरीक्षाच ठरण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्य विधानसभेच्या इतिहासात सर्वात कमी कालावधीचे हे पावसाळी अधिवेशन आहे.
विकास, स्थैर्य, आर्थिक स्थिती, कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार, प्रदूषण अशा अनेक कळीच्या मुद्यांवर सामान्य जनतेच्या रोषास पात्र ठरलेले कामत सरकार, गृह कलहाच्या वणव्यातही चांगलेच सापडले आहे. बाबुश मोन्सेरात सारख्यांच्या सरकार पाडण्याच्या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे गडबडलेल्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील सर्वांत ज्येष्ठ अशा दयानंद नार्वेकर यांनाच मंत्रिपदावरून हटविण्याचा अधिवेशनाचा तोंडावर जो निर्णय घेतला तो केवळ धोकादायकच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना अधिकच अडचणीत आणणारा असल्याची टीका सर्वत्र होऊ लागली आहे. पक्षांतर्गत असंतोषही त्यामुळे वाढू लागल्याने एकाबाजूने पक्षांतर्गत टीका तर दुसऱ्या बाजूने सरकाराअंतर्गत तीव्र होत जाणारे वाद अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांची कसोटी पाहणारे ठरतील असा अंदाज आहे.
खाण प्रदूषण, बिल्डर लॉबीचे वाढते प्रस्थ, गावागावांत उफाळणारा असंतोष, न्यायालयांची आक्रमक भूमिका, खंडीत आणि वीज पुरवठा, भर पावसात कोरडे पडलेले नळ, कचऱ्यांची कमी होण्याऐवजी वाढत जाणारी समस्या, जमीन व्यवहारांच्या नवनवीन भानगडी अशा अनेक विषयांवरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याची सर्व तयारी केली असताना कामत यांना सरकाराअंतर्गत पुरेसे सहकार्य मिळण्याची शक्यता नसल्याने हे अधिवेशन त्यांच्यासाठी एक संकटच ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कामत मुख्यमंत्री झाल्यापासून या सरकारच्या विधिमंडळ कामकाजाची जबाबदारी हाताळणारे दयानंद नार्वेकर आता मंत्री नाहीत त्यामुळे कामत यांनी आपला मोठा आधार गमावलेला आहे. यापूर्वीच्या दोन्ही विधानसभा अधिवेशनाच्या वेळी कामत यांना नार्वेकर यांची मोठी मदत झाली होती, परंतु अटीतटीच्या वेळी त्यांचाच बळी दिला गेल्याने परिस्थितीत मोठा फरक पडला आहे. शिवाय पायावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे ते विधानसभेत उपस्थित राहतील की नाही याबद्दल शंकाच आहे. मुख्यमंत्री कामत यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारविरोधी उघड प्रतिक्रिया व्यक्त करून कामत यांची अधिवेशनाच्या ऐन तोंडावर गोची करून ठेवली आहे. त्यांच्या अडचणीत अधिकच भर घातली आहे. म. गो. पक्षही आतून नाराज असल्याचे सांगितले जाते. परिणामी मुख्यमंत्र्यांसाठी अधिवेशन चांगलेच कठीण ठरण्याचे संकेत आहेत.
दरम्यान उद्या दुपारी अडीच वाजता अधिवेशनाला आरंभ होईल. ठरलेल्या कार्यक्रमानुसार २८ ऑगस्टपर्यंत ते चालेल.

No comments: