Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 22 August, 2008

"नॅनो'ला विलंबाची शक्यता

सिंगूरमधील हिंसाचाराने टाटा संतप्त
नवी दिल्ली, दि. 22 - पश्चिम बंगालमधील सिंगूरमध्ये बहुचर्चित "नॅनो' या छोट्या कारच्या प्रकल्पाला विरोध सुरूच राहिला तर लवकरच हा प्रकल्प अन्यत्र हलविण्यात येईल, अशी धमकी उद्योगपती रतन टाटा यांनी दिली आहे. त्यामुळे नॅनो मोटार रस्त्यावर धावण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
याविषयीची माहिती पश्चिम बंगालचे उद्योगमंत्री निरुपम सेन यांनी दिली. सेन यांनी नुकतीच रतन टाटा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यात टाटा यांनी या भावना व्यक्त केल्याचे सेन यांनी सांगितले. सेन म्हणाले की, जवळपास एक तासपर्यंत आमची चर्चा झाली. त्यात टाटा यांनी सिंगूर येथील योजनेबाबत चिंता व्यक्त केली. या प्रकल्पाला इतक्या मोठ्या प्रमाणावर विरोध होईल, असे त्यांना वाटले नव्हते. या योजनेच्या पश्चिम बंगालमधील भवितव्याविषयी त्यांनी आता भीतीही व्यक्त केली. टाटा म्हणाले की, हा प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये उभारण्याची आमची योजना आहे. पण, अगदी सुरुवातीपासूनच प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध सुरू आहे. त्यात राजकीय नेतेही सामील झाले आहेत. शेतकऱ्यांनी अशा प्रकारे विरोध सुरूच ठेवला तर हा प्रकल्प सिंगूरमधून हटवून अन्यत्र हलविला जाऊ शकतो. त्यामुळे जितकेही नुकसान होईल, त्याची आम्हाला पर्वा नाही. मात्र, प्रकल्प हलविल्याने राज्याचे नाव खराब होईल. या मुद्यावर आपण ममता बॅनर्जी यांच्यासोबतही चर्चा करणार असल्याचे टाटांनी स्पष्ट केले आहे.
सेन यांनी सांगितले की, आम्ही टाटा यांना सिंगूरमधील योजना न हलविण्याबाबत विनंती केली आहे. सोबतच तेथील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीही आश्वस्त केले आहे. या प्रकल्पाला विरोध म्हणून तृणमूल कॉंग्रेसने जे आंदोलन छेडले आहे त्या पार्श्वभूमीवर टाटांच्या योजनेला धक्का लागू नये, याची तरतूदही राज्य शासन करणार आहे. "नॅनो' या बहुचर्चित छोट्या कारच्या निर्मितीसाठी पश्चिम बंगाल सरकारने टाटांना सिंगूर येथील जमीन देऊ केली आहे. प्रकल्पाच्या उभारणीपासून येथील शेतकऱ्यांनी त्याला जोरदार विरोध करीत छेडलेले आंदोलन अद्याप सुरूच आहे. आज यावर प्रथमच रतन टाटा यांनी इतकी प्रखर प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. यावर राजकीय नेत्यांच्या भावना अद्याप समजू शकलेल्या नाहीत.

No comments: