मुख्यमंत्र्यांचा दावा
पणजी, दि.19 (प्रतिनिधी) - राज्यात एकीकडे बेकायदा खाण उद्योगाविरोधात जनता रस्त्यावर उतरत असताना खाण खाते सांभाळणारे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मात्र राज्यात एकही बेकायदा खाण नसल्याचा दावा केला आहे.
केप्याचे आमदार चंद्रकांत ऊर्फ बाबु कवळेकर यांनी विधानसभेत यासंबंधी खाण मंत्र्यांना केलेल्या एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्री कामत यांनी हा पवित्रा घेतला. यासंबंधी कवळेकरांना देण्यात आलेल्या लेखी उत्तरात राज्यात एकूण 337 खाण करार झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यात प्रत्यक्षात केवळ 94 खाणी सुरू असल्याचेही सांगण्यात आले. राज्यात कायद्याचे उल्लंघन करून एकही खाण सुरू असल्याची माहिती खाण संचालनालयाकडे नाही, अशी माहिती या लेखी उत्तरात देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या तीन खाण कंपन्यांकडून पर्यावरण सुरक्षा परवाना मिळवण्यात आला नाही, असे सांगून त्यात सत्तरी तालुक्यातील शेळपे-कुर्डो येथील मे. लिमा लेतांव ऍण्ड कंपनी, सत्तरी तालुक्यातीलच कणकिरे येथील मेसर्स दामोदर मंगलजी ऍण्ड कंपनी व सांगे तालुक्यात किर्लपाल येथील मेसर्स सॉक तिंबलो इरमावस यांचा समावेश आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगे तालुक्यातील एका खाण कंपनीकडून खोटे दाखले सादर करून बेकायदा खाण व्यवसाय सुरू करून कोट्यवधींचा पैसा केल्याचा गौप्यस्फोट करून कागदपत्रेच सादर केल्याने खाण खात्याचा हा दावा फोल ठरला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी येत्या अधिवेशनापूर्वी बेकायदा खाणींबाबतचा चौकशी अहवाल विधानसभेसमोर ठेवण्याचे मान्य केले आहे.
Wednesday 20 August, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment