नवी दिल्ली, दि.20 - केंद्र सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरुद्ध आणि पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींचा निषेध म्हणून डावे समर्थित आठ कर्मचारी संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारल्याने विमानसेवेसह अनेक प्रमुख सेवांवर याचा परिणाम झाला.
संपाचा सर्वाधिक परिणाम डाव्या पक्षांच्या पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळ या राज्यांवर झाला. नवी दिल्ली आणि कोलकाता दरम्यानची सर्व उड्डाणे आज रद्द करण्यात आली. दिल्ली-कोची, तिरुवनंतपुरम, पोर्ट ब्लेअर आणि मुंबईचीही उड्डाणे रवाना होऊ शकली नाहीत. एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे 22 हजार कर्मचारी आज सकाळी सात वाजेपासून 12 तासांच्या संपावर गेले. संपामध्ये बॅंक, विमा, दूरसंचारसह अनेक सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
देशातील बहुतांश मोठ्या विमानतळांवरील सर्व उड्डाणे गुरुवारपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. कोलकाता येथील हावडा आणि सियालदाह या रेल्वे स्थानकांवर आज सकाळपासूनच शुकशुकाट होता. येथून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जगन्नाथ एक्सप्रेस, हावडा-मुंबई, गुवाहाटी-बंगलोर, जोधपूर एक्सप्रेस, दून एक्सप्रेससह अनेक गाड्या रेल्वे स्थानकावरच उभ्या होत्या. रस्त्यांवर वाहनांची संख्याही अतिशय तुरळक होती. दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठानेही बंद होती. केरळमध्ये तर गेल्या सहा महिन्यातील हा 80 वा संप होता.
बॅंक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाजावर परिणाम झाला. तामिळनाडूमध्ये बॅंक व्यवस्थेवर सर्वाधिक परिणाम झाला. विमानतळ प्राधिकरणाचे कर्मचारी संपावर गेल्याने हवाई दलाच्या सुमारे 250 कर्मचाऱ्यांना विमानतळावर तैनात करण्यात आले होते. संपाच्या काळात मालवाहक गाड्या आणि तीन चाकी सोडून राज्य सरकारच्या बससेवा रोजच्याप्रमाणे सुरू होत्या.
महागाई नियंत्रणात आणणे, किमान मजुरी निर्धारित करणे, कामाची सुरक्षा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अधिक व्यापक करणे आणि सहाव्या वेतन आयोगातील विसंगती दूर करणे यासह अनेक मागण्यांसाठी सिटू आणि आयटकसारख्या कामगार संघटनांनी आजचा देशव्यापी संप पुकारला होता.
Thursday 21 August, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment