Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 June, 2008

शिक्षकांच्या बदल्यांसदर्भात धोरणच बदलण्याच्या हालचाली

पणजी, दि. 31 (प्रतिनिधी) - शिक्षण खात्यात सरकारी शिक्षकांच्या बदली अर्जांचा खच पडला असून शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यास केवळ एक आठवडा असताना या अर्जांचे करावे काय असा यश प्रश्न खात्यासमोर निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात तयार केलेले धोरण या अर्जांच्या आड येत असल्याने व यापूर्वी उच्च न्यायालयाकडून बदलीसंदर्भात खात्यावर जोरदार ताशेरे ओढल्याने आता हे धोरणच बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
विविध सरकारी शाळांतील शिक्षकांनी सध्या बदलीसाठी शिक्षण खात्याकडे तगादा लावला असून सुमारे दीडशे ते दोनशे अर्ज खात्याकडे पडून आहेत. विशेष म्हणजे या अर्जातील बहुतेक अर्ज हे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या शिफारशीवरून आल्याने शिक्षण संचालिका सेल्सा पिंटो यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकांच्या बदलीसंदर्भात यापूर्वी खात्यावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
सरकारने 2001 साली शिक्षकांच्या बदली संदर्भात धोरण तयार केले होते. आता सरकार पक्षातील विविध नेत्यांकडून आपल्या मर्जीतील शिक्षकांच्या बदल्यांसाठी खात्याकडे तगादा लावला जात असल्याने या धोरणानुसार या शिक्षकांची बदली करणे कठीण बनले आहे. या धोरणाचे उल्लंघन करून खात्याने आतापर्यंत 20 ते 25 जणांची बदली केली असली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात बदली अर्ज निकालात काढणे शक्य नसल्याने खातेही हतबल झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कामत यांच्याकडेच शिक्षण खाते असल्याने व या अर्जांवर कोणती कार्यवाही अशी विचारणा त्यांच्या कार्यालयातूनच होत आहे. त्यामुळे खात्याच्या अधिकाऱ्यांकडून शिक्षण धोरणाच्या अडचणीचे कारण पुढे करण्यात आले आहे. आता हे धोरणच बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments: