Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 June, 2008

वह्या-पुस्तकेही महागली.. पालक हैराण...

प्रीतेश देसाई
पणजी, दि. 31 - जून महिन्यापासून नव्या शैक्षणिक वर्षास प्रारंभ होत आहे. मात्र जगभरात जिथे महागाईने धुडगूस घातला आहे त्यातून शैक्षणिक क्षेत्रही सुटू शकलेले नाही. यंदा तर बाजारात वह्या - पुस्तकांपासून शाळेच्या प्रत्येक वस्तूचे दाम दुप्पट झाले आहेत.
गेल्या पाच वर्षांत वह्या - पुस्तकांच्या किमतीत विक्रमी वाढ झाली असून, यंदा या महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे संसाराचा गाडा ओढताना जेरीस आलेल्या पालकांपुढे महागाईच्या या पर्वाला कसे सामोरे जायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
"काळ्या दगडाची पाटी आणि पेन्सिल' ही प्राथमिक शिक्षणातील छोटीशी बाजारपेठ लोकांच्या विस्मृतीत जाऊन तिची जागा अत्याधुनिक पाट्या व अत्याधुनिक पेन्सिलने घेतली आहे. पाट्या - पेन्सिलचे जिथे आधुनिकीकरण झाले तिथे त्यांचे दरही वाढत गेले. परिस्थितीनुरुप पालकही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रथमदर्शनी अनावश्यक भासणाऱ्या या वस्तू जादा किंमत मोजून विकत घेऊ लागले. ही स्पर्धा केवळ बाजारपेठेपुरतीच सीमित राहिलेली नसून लोकांच्या दैनंदिन जीवनातही तिने शिरकाव केला आहे. त्यामुळे शेजाऱ्याने स्वतःच्या मुलाला "मिकी माऊस'च्या आकाराची पाटी आणली तर आपल्या मुलालाही तशीच पाटी उपलब्ध करून देण्यासाठी पालक प्रयत्नशील आहेत. परिणामी उत्पादकाचा नफा व पालकांच्या खिशाला कात्री! पाच वर्षांपूर्वी जी वस्तू अगदी सर्वसामान्यांच्या "बजेट'मध्ये होती, आज तिच वस्तू त्याच्या "बजेट'बाहेर गेली आहे. तरीही महिनाअखेरीस करावी लागणारी तारेवरची कसरत सांभाळूनही पालक आपल्या पाल्याला हिरमुसला होऊ न देण्याची खबरदारी पालक घेताना दिसतात. शाळेत जाणाऱ्या मुलाला "शाळा' म्हणजे नक्की काय हे कळण्याआधीच आपली पाटी कशी असावी, पुस्तक कसे असावे, बॅग, लंच बॉक्स कसा असावा याचे वेध लागतात. त्यामुळेच शैक्षणिक साहित्याचे दर गगनाला भिडत चालले आहेत. त्यामुळेच असावे की पाच वर्षांपूर्वी जे गणवेश 250 ते 600 रुपये दरम्यान उपलब्ध होत होते आज त्यांची किंमत 400 ते 1000 रुपये झाली आहे. जी दप्तरे दीडशे ते पाचशे रुपयांत उपलब्ध होत होती यंदा तीच दप्तरे पाचशे ते आठशे रुपयात उपलब्ध होत आहेत. मोजे आणि बूट 300 ते 450 रुपयांत उपलब्ध होत होते आज त्याची किंमत 300 ते 650 इतकी झाली आहे. मग कंपास बॉक्स जे अगदी 20 ते 200 रुपयेपर्यंत मिळत होते आज तेच विकत घेण्यासाठी पालकांना 40 ते 250 रुपयांची पदरमोड करावी लागते. "लंच बॉक्स' म्हणजेच मुलांचा "टिफिन' जो पूर्वी 20 ते 100 रुपयांपर्यंत उपलब्ध व्हायचा त्यासाठी आता 30 ते 200 रुपये खर्च करावे लागत आहेत. पाच वर्षांपूर्वी 100 पानी वही 5 ते 8 रुपयांमध्ये मिळत असे, आज त्याच वहीसाठी 8 ते 15 रुपये द्यावे लागतात. 200 पानी वही 8 ते 10 रुपयांऐवजी 15 ते 25 रुपयांमध्ये विकत घ्यावी लागते. शिवाय रेनकोट, छत्री मुलांना आणायला व सोडायला असणारी स्कूल बस, पाळणाघरे, शिकवणी, पोहणे, कराटे, नृत्य, संगीत यासाठी प्रशिक्षण वर्गात घ्यावा लागणारा प्रवेश या गोष्टी म्हणजे पालकांसाठी खर्चाचा डोंगर ठरल्या आहेत. हा खर्चाचा डोंगर पेलण्यासाठी आई-वडील दोघेही नोकरी करतात. आपल्या पाल्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. "प्रेस्टिज'च्या नावाखाली ते आपल्या मुलांना महागड्या वस्तूंची सवय लावतात. मात्र मुलांना हवा असलेला वेळ आणि प्रेम, माया आदी देण्यास ते कमी पडतात. परिणामी स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी त्यांचे पाल्य निश्चितच तयार होतात. तथापि, ते मानवापेक्षा यंत्रमानवाचे प्रतिनिधीत्वच अधिक प्रमाणात करतात, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये!

No comments: