Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 4 June, 2008

इंधन दरवाढीचा भडका

पेट्रोल ५, डिझेल ३ व गॅस ५० रुपयांनी महाग
डावे 'लाल'; आजपासून देशव्यापी आंदोलन
पाठिंब्याचाही फेरविचार करणार
दरवाढीविना पर्यायच नव्हता : देवरा
...हा तर आर्थिक दहशतवाद : भाजपा
महागाई आणखी भडकणार
देशभरात संतप्त पडसाद
उद्योग जगतातूनही तीव्र चिंता
सपाची तीव्र निदर्शने; रेल्वे रोखली
उद्या "तामिळनाडू बंद'
तृणमूलचा शुक्रवारी "बंगाल बंद'
दरवाढीतून केवळ केरोसिनची सुटका
९४६ अब्ज रुपयांच्या ऑईलबॉण्डची घोषणा
पेट्रोलवरील जकात शुल्कात कपात
उत्पादन शुल्कात १ रुपयांची कपात


नवी दिल्ली, दि.४: खाद्यान्नासह जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडलेल्या महागाईने आधीच हैराण असलेल्या देशवासीयांचे कंबरडे मोडणारा अत्यंत घातकी निर्णय केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारने आज घेतला. पेट्रोल लिटरमागे पाच, डिझेल लिटरमागे तीन, तर स्वयंपाकाचा गॅस प्रति सिलेंडरमागे ५० रुपयांनी महाग करण्याच्या कठोर निर्णयावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. केंद्रीय मंत्रिमंडळाने दरवाढीच्या या निर्णयाला मंजुरी दिली असून नवीन दरवाढ आज मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आली आहे. दरवाढ करण्याशिवाय पर्यायच शिल्लक नव्हता त्यामुळे ही सौम्य स्वरूपाची दरवाढ केली, अशा शब्दांत पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी दरवाढीचे समर्थन करताना समाधान व्यक्त केले आहे, तर दुसरीकडे डावे पक्ष या दरवाढीमुळे "लाल' झाले असून त्यांनी देशव्यापी आंदोलनाची तयारी केली आहे. "संपुआला दिलेल्या पाठिंब्याचा आम्ही फेरविचार करू,' असेही त्यांनी म्हटले आहे. केंंद्रात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपानेही दरवाढीच्या निर्णयाचा निषेध करताना आजच्या दिवसाला "काळा दिवस' संबोधून "ही दरवाढ म्हणजे आर्थिक दहशतवादच आहे,'आहे म्हटले आहे. आधीच आटोक्यात येत नसलेली महागाई या दरवाढीमुळे अधिकच भडकण्याची दाट शक्यता आहे. आजच्या दरवाढीतून केवळ केरोसिनला वगळले आहे. गॅसची प्रचंड वाढ केल्याने आता जगावे तरी कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कारण त्यांचे महिन्याचे बजेट या दरवाढीमुळे कोलमडणार आहे. या दरवाढीचा सर्व स्तरांतून निषेध होत असून "या दरवाढीबद्दल संपुआ सरकारला जबर किंमत चुकवावी लागेल,' अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
डावे संतप्त; उद्यापासून देशव्यापी आंदोलन
पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत मोठी दरवाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयाने डाव्या आघाडीतील माकपा, भाकपा, आरएसपी व फॉरवर्ड ब्लॉक हे चारही पक्ष कमालीचे संतप्त झाले आहेत. ""ही दरवाढ म्हणजे सर्वसामान्यांच्या थोबाडीत मारलेली थप्पडच आहे. केंद्र सरकारच्या लोकविरोधी धोरणांचा खरा चेहराच या दरवाढीने समोर आणला आहे. ही दरवाढ अनावश्यक होती. या दरवाढीचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन केले जाऊ शकत नाही,''अशी प्रतिक्रिया डाव्या आघाडीने व्यक्त केली आहे. "दरवाढ सहन करणार नाही,' याविषयी सरकारला यापूर्वी वारंवार बजावूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष करीत दरवाढ केली. या निर्णयाच्या निषेधार्थ डावे पक्ष उद्यापासून आठवडाभर देशव्यापी आंदोलन पुकारणार आहेत. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळ या आमची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये आम्ही बंद पुकारणार आहोत, असेही डाव्यांनी म्हटले आहे. उद्यापासून म्हणजे ५ तारखेपासून ११ तारखेपर्यंत आम्ही आठवडाभर देशव्यापी आंदोलन पुकारणार आहोत. या आंदोलनात समाजवादी पार्टी, तेलगु देसम पार्टीनेही सहभागी व्हावे, असे आवाहन डाव्यांनी केले आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ त्यांनी ६ जूनला "तामिळनाडू बंद'चे आवाहन केले आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही या दरवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी "पश्चिम बंगाल बंद'चे आवाहन केलेले आहे.
पाठिंब्याचा फेरविचार करू!
संपुआ सरकारला बाहेरून दिलेल्या पाठिंब्याचाही आम्ही फेरविचार करू, असे भाकप नेते गुरुदास दासगुप्ता यांनी म्हटले आहे. ""ही दरवाढ मागे घ्यायला सरकारला आम्ही भाग पाडू. यासाठी आम्ही रस्त्यांवर उतरून आंदोलन पुकारू,''अशी प्रतिक्रिया आरएसपीचे नेते अबानी रॉय व फॉरवर्ड ब्लॉकचे नेते जी. देवराजन यांनी व्यक्त केली.
पेट्रोलियम कंपन्यांना तोट्यातून बाहेर काढण्यासाठी पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात मोठी दरवाढ करून संपुआ सरकारने सर्व भार सर्वसामान्यांच्याच शिरावर लादलेला आहे. या निर्णयाचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होणार आहे. सर्वसामान्यांचे बजेट या दरवाढीमुळे कोलमडणार आहे, असे देवराजन म्हणाले.
""कोणत्याही स्थितीत या दरवाढीचे समर्थन करता येणार नाही. ही दरवाढ अनावश्यक आहे. या दरवाढीने ८.१ टक्क्यांवर असलेली महागाई आणखी वाढेल. दरवाढ न करता अन्य पर्यायाने मार्ग काढले जाऊ शकले असते परंतु कोणत्याही अन्य पर्यायांचा विचार न करता केंद्राने दरवाढ केली. दरवाढ करण्याचा हा निर्णय दुर्दैवी आहे. इंधन मोठ्या प्रमाणात निर्यात करून प्रचंड नफा कमावणाऱ्या कार्पोरेट क्षेत्राला धक्का न लावता दरवाढ करून सरकारने सर्वसामान्यांच्या खिशात हात घातलेला आहे. सर्वसामान्यांशी सरकारला काहीही देणे-घेणे नाही, सरकार त्यांच्याविषयी संवेदनशून्य आहे, हेच यावरून स्पष्ट होते, ''अशी प्रतिक्रिया माकपाचे महासचिव प्रकाश कारत व भाकपा नेते डी. राजा यांनी व्यक्त केली आहे.
दरवाढ म्हणजे आर्थिक दहशतवाद ; भाजपाची प्रतिक्रिया
"पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ करण्याचा आजचा दिवस "काळा दिवस' आहे. केंद्रातील संपुआ सरकार दिशाहिन झालेले आहे. हा निर्णय म्हणजे देशासाठी आर्थिक दहशतवादच आहे.,''अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी आज व्यक्त केली.
"या दरवाढीचे अत्यंत प्रतिकूल परिणाम अर्थव्यवस्थेवर पडणार आहेत. महागाई आटोक्यात आणण्यासंबंधी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आजवर जे काही दावे केले ते किती फोल आहेत, हे या दरवाढीच्या निर्णयावरून सिद्ध होते,''असेही रूडी यांनी सांगितले.
""या दरवाढीचा सर्वात आधी व सर्वात मोठा चटका "आम आदमी'लाच बसणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस संपुआ सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. दरवाढीला विरोध दर्शविणारे डावे दिखावा करीत आहे. त्यांचा हा विरोध हास्यास्पद आहे. वास्तविक ते देखील सरकारच्या या घातकी निर्णयात सहभागी आहेत,''असेही रूडी यांनी सांगितले.
माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनीही या दरवाढीचा निषेध केला असून या निर्णयाची जबर किंमत संपुआला चुकवावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
खनिज तेलावरील जकात शुल्कात कपात
खनिज तेलावरील जकात शुल्कात सरकारने कपात करण्याची घोषणा आज केली. या घोषणेनुसार, खनिज तेलावर असलेले ५ टक्के जकात शुल्क आता रद्द झालेले आहे. हाय स्पीड डिझेल (एचएसडी) व पेट्रोलवरील जकात शुल्कातही सरकारने कपात केली असून ते ७.५ वरून २.५ टक्क्यांवर आणलेले आहे. पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे १ रुपयाने कपात करण्यात आलेली आहे. महसुली जकात शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती भडकल्या असूनही देशातील पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ आतापर्यंत न झाल्याने तोटा सहन करीत असलेल्या देशातील तेल कंपन्यांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी दरवाढ करावी लागली, असे पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी सांगितले. तेल कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठीच पेट्रोलियम पदार्थाच्या जकात शुल्कात कपात करण्यात आली. मात्र, यामुळे चालू आर्थिक वर्षातील उर्वरित दहा महिन्यांमध्ये सरकारला २२ हजार ६६० कोटी रुपयांचा महसूल गमवावा लागणार आहे, असे देवरा यांनी सांगितले.
९४६ अब्ज रुपयांच्या ऑईलबॉण्डची घोषणा
देशातील तेल कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी अर्थ मंत्रालय यावर्षी ९४६ अब्ज रुपयांचे ऑईलबॉण्ड जारी करणार आहे. खनिज तेलाच्या किमती भडकल्याने तेल कंपन्यांना २००८-२००९ या वर्षात एकूण २.४५ लाख कोटी रुपयांचा तोटा होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. शुल्ककपात, दरवाढ, ऑईलबॉण्ड आणि तेल कंपन्यांकडून स्वयंवहन केला जाणाऱ्या तोट्याशिवाय जवळपास २९ हजार कोटी रुपयांचा तोटा भरून काढणे बाकी राहील, असाही अंदाज वर्तविला जात आहे, अशी माहिती महसूल सचिव पी. व्ही. भिडे यांनी दिली.
जकात आणि उत्पादन शुल्कात कपात केल्याने तेल कंपन्यांचा तोटा २२ हजार ६६० कोटी रुपयांनी भरून निघणार आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीमुळे २१ हजार १२३ कोटी रुपये गोळा होतील. याशिवाय ओएनजीसी, ऑईल इंडिया, गेल आणि तेल विपणन कंपन्या एकत्रितपणे ६५ हजार कोटी रुपयांचा भार स्वत: वहन करतील, असेही भिडे यांनी सांगितले.
सपाची तीव्र निदर्शने; रेल्वे रोखली
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीचा भाजप, डावे, तृणमूलसह समाजवादी पार्टीनेही तीव्र निषेध केला आहे. सपा कार्यकर्त्यांनी वाराणसी, अलाहाबाद, लखनऊ, कानपूरमध्ये रस्त्यांवर उतरून निदर्शने करताना संपुआ सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध यावेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली. अलाहाबादेत सपा कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखून धरली.
उद्योग जगतातूनही चिंता
पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर उद्योग जगतातूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
महागाई वाढल्याने सर्व स्तरातील ग्राहक सतर्क झालेला आहे. महागाईचा फटका उद्योग जगतालाही बसला असून मंदीच्या स्थितीचा सामना त्यांना करावा लागत आहे. आजच्या या दरवाढीच्या निर्णयावर टाटा मोटर्स व होंडा या आघाडीच्या मोटार कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
या दरवाढीमुळे ऑटो इंडस्ट्रीज प्रभावित होईल, असे टाटा मोटर्सने म्हटले आहे. तर "पेट्रोल, डिझेलचे दर वाढविल्याने गाड्यांच्या विक्रीवर परिणाम होणार आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करायला पाहिजे, असे "होंडा'ने म्हटले आहे.

No comments: