Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 2 June, 2008

मान्सून आठवडाअखेर

पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - मान्सूनने काल केरळमध्ये धडक दिली असून वाऱ्याची गती अशीच राहिल्यास येत्या सहा दिवसांत मान्सूनचे आगमन गोव्यात होण्याची दाट शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे.
मोसमी वाऱ्यांचे केरळ किनारपट्टीवर आगमन झाल्याचे काल हवामान खात्याने अधिकृतपणे जाहीर केले आहे. केरळ किनारपट्टीवरून मान्सून गोव्यात पोचायला किमान सहा ते सात दिवसांचा कालावधी लागतो. गेल्या काही दिवसांत मान्सूनपूर्व पडलेल्या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्यांना शांत केले असले, तरी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव पावसाच्या आगमनाकडे टक लावून बसले आहेत.
चालू वर्षी देशभरातील मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीइतके असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमी) वर्तविला आहे. यावर्षी सरासरी ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यताही केंद्रीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी सरासरीच्या १०५ टक्के इतका पाऊस झाला होता. तर दक्षिण भारतात सरासरीच्या २६ टक्के जास्त पाऊस नोंदवला गेला, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
पावसाची पूर्व तयारी म्हणून अनेक पंचायतींनी गटारे साफ करण्याचे काम हाती घेतले आहे, तर काही ठिकाणी अद्याप मान्सूनपूर्व कामाची सुरुवातही केलेली नाही. त्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
नैऋत्य मान्सून कर्नाटकात दाखल
नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी कर्नाटकात धडाक्यात बरसल्याचे वृत्त आहे.
राज्यातील अनेक भागांना शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासात बंगलोरसह कारवार, अंकोला आणि चिकमंगलूर येथे मुसळधार पावसाची नोंद झाली. दरम्यान, येत्या ४८ तासात किनारपट्टीसह दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. याच दरम्यान ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

No comments: