Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 20 January, 2011

अबकारी घोटाळ्यातील संशयित मुख्यमंत्र्यांचे विशेषाधिकारी कसे?


भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांचा सवाल


पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पर्दाफाश केलेल्या अबकारी घोटाळ्यातील मुख्य संशयित असलेले माजी अबकारी आयुक्त संदीप जॅकीस यांना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपले विशेष सेवा अधिकारी नेमून नेमका कोणता हेतू साध्य केला आहे, असा सवाल भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी केला आहे.
वित्तमंत्री या नात्याने अबकारी आयुक्तालयाचा ताबा मुख्यमंत्र्यांकडे येतो. अबकारी घोटाळ्याच्या चौकशीचे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे, अशावेळी संदीप जॅकीस यांना ‘ओएसडी’ नेमून या खात्यात हस्तक्षेप करण्याचीच संधी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, असा ठपकाही श्री. आर्लेकर यांनी ठेवला आहे.
अबकारी खात्यातील कथित घोटाळ्यानंतर या पदावरून हटवण्यात आलेले व नंतर व्यावसायिक कर आयुक्तपदावर झालेल्या नेमणुकीवरूनही वादाच्या भोवर्‍यात अडकलेले संदीप जॅकीस यांना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपले चौथे विशेष सेवा अधिकारी म्हणून नेमले आहे. तेव्हा अबकारी आयुक्तपदावरून हटवल्यानंतर मुख्यमंत्री कामत यांनी जॅकीस यांना उत्तर गोवा जिल्हाधिकारीपदाची बक्षिशी दिली होती. मात्र महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी मिहीर वर्धन यांना हटवण्यास हरकत घेतल्याने हा बेत फसला. गेले साडेसात महिने नेमणुकीच्या प्रतीक्षेत असलेले संदीप जॅकीस हे सेवा काळात सर्वांत जास्त विनाकाम राहिलेले दुसरे अधिकारी ठरले आहेत. दरम्यान, अबकारी घोटाळ्यामुळे हटवण्यात आलेल्या संदीप जॅकीस यांना विशेष अधिकारी नेमून मुख्यमंत्र्यांनी उघडपणे अबकारी घोटाळ्याचे समर्थनच केले आहे. असेच करायचेच होते तर मुळात जॅकीस यांना अबकारी आयुक्तपदावरून हटवलेच कशाला, असा सवालही आर्लेकर यांनी केला. आता छुप्या पद्धतीने राज्याला लुटण्याचे सोडून मुख्यमंत्री कामत यांनी लुटण्याचे अधिकृत परिपत्रकच जारी करणे तेवढे बाकी ठेवले आहे, असा जबरदस्त टोलाही त्यांनी हाणला.

No comments: