Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 22 January, 2011

कामत, चर्चिल खाण कंपन्यांचे हस्तक

पंचवाडी बचाव समितीचा गंभीर आरोप
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): शेतीप्रधान व निसर्गसौंदर्याची श्रीमंती लाभलेल्या आमच्या लाडक्या पंचवाडी गावात खाण उद्योगाला घुसखोरी करण्याचा वाव देऊन सरकार येथील लोकांच्या भवितव्यावर लाथ मारीत आहे. पंचवाडीवासीयांना अंधारात ठेवून ज्या पद्धतीने एका खाण कंपनीसाठी बंदर व रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे ते पाहता आम आदमीचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री दिगंबर कामत व स्वतःला लोकनेते म्हणवून घेणारे सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव हे खाण कंपन्यांचे हस्तक असल्याचेच सिद्ध होते, असा गंभीर आरोप ‘पंचवाडी बचाव समिती’ने केला आहे.
शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी गावात होऊ घातलेल्या नियोजित खनिज बंदर व खनिज रस्ता प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पंचवाडी बचाव समितीने आज चौथ्यांदा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची आल्तीनो येथील सरकारी बंगल्यावर भेट घेतली. या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या पंचवाडीवासीयांसमोर बोलण्याचे धाडस न झालेल्या मुख्यमंत्र्यांनी समितीच्या शिष्टमंडळाकडेच चर्चा करणेच पसंत केले. सरकारच्या कृतीवर जोरदार आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतलेल्या समितीच्या पदाधिकार्‍यांना येत्या २४ रोजी सर्व संबंधित मंत्री व अधिकार्‍यांची बैठक बोलावून चर्चा करू व सर्वमान्य तोडगा काढू, असे गुळमुळीत झालेले आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.
पंचवाडी बचाव समितीचे निमंत्रक क्रिस्टो डिकॉस्ता व शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पंचवाडीवासीयांनी आज मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बंगल्यावर धडक दिली. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीची सर्वसाधारण बैठक पर्वरीला होती व त्यात व्यस्त असलेल्या मुख्यमंत्र्यांनी घाईघाईनेच समितीच्या पदाधिकार्‍यांची भेट घेतली व तिथून काढता पाय घेतला. मुख्यमंत्र्यांना भेटण्याची ही शेवटची वेळ आहे व यापुढे पंचवाडीच्या रक्षणार्थ येथील लोक आपली कृती सुरू करणार आहेत, असा इशारा यावेळी क्रिस्टो डिकॉस्ता यांनी दिला. या खनिज रस्त्याचा स्थानिकांना कोणताच उपयोग नाही व हा नियोजित रस्ता एकाही अंतर्गत रस्त्याला जोडला जात नाही. खाण कंपनीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्ता बांधण्याची ही योजना कशी काय, असा प्रश्‍न उपस्थित करून ‘सीआरझेड’ कायद्याचे उल्लंघन करून हा रस्ता तयार केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
पंचवाडी गावातील बहुतांश लोक शेती व्यवसायावरच आपली उपजीविका करीत आहेत. या नियोजित प्रकल्पांमुळे संपूर्ण पंचवाडी गावच उध्वस्त होणार असल्याने त्याला विरोध करण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घेण्याचीही तयारी आम्ही केली आहे, असे नागरिकांनी सांगितले.
आता हद्दच झाली : महादेव नाईक
पंचवाडीवासीयांना नको असेल तर हा प्रकल्प होणार नाही, असे सांगितले जात असताना अचानक प्रकल्पासाठी निविदा जारी होतात याचा नेमका अर्थ काय, असा सवाल करून सरकार जनतेला हिंसेचा मार्ग अवलंबण्यास प्रोत्साहित करीत असल्याचा आरोप शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी केला. एका खाण कंपनीसाठी पंचवाडीसारख्या शेतीप्रधान गावाचा बळी देण्याचे धाडस या सरकारला होतेच कसे, असा प्रश्‍न उपस्थित करून याचे
गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला.

No comments: