Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 18 January, 2011

कॉंग्रेस सरकार असंवेदनशील

आमदार दामू नाईक यांचे टीकास्त्र

पणजी, दि. १७ (पत्रक)
कॉंग्रेस सरकार जनतेप्रति असंवेदनशील बनले असल्याने आम आदमीला जगणे मुश्कील बनले आहे, अशी कडवट टीका भाजप विधी मंडळाचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार दामू नाईक यांनी केली आहे.
महागाईच्या आगडोंबात सामान्य जनता होरपळून जात असतानाच आता पेट्रोल दरात वाढ करून जनतेला सरकारने आणखीन चटके दिले आहेत. भाजप या दरवाढीचा तीव्र निषेध करत असून या असंवेदनशील कॉंग्रेस सरकारला जनतेने त्यांची योग्य जागा दाखवावी, असे आवाहनही श्री. नाईक यांनी केले आहे.
केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यांत आठ वेळा पेट्रोलचे दर वाढविले आहेत. १.७६ लाख कोटींचा स्पेक्ट्रम घोटाळा करणार्‍या सरकारकडून हीच अपेक्षा होती. कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकार देशातील दिवसेंदिवस भरमसाठ वाढणारी महागाई नियंत्रणात ठेवण्यास तसेच जीवनावश्यक वस्तू जनतेला रास्त दरात उपलब्ध करून देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तुम्ही आरडाओरड करा वा काही करा, आम्ही दरवाढ करणारच, ही भूमिका सध्याच्या सरकारने घेतलेली आहे. गरिबांना संपवण्याचा कट या सरकारने आखलेला आहे. मुळात शेतकर्‍यांना कांदा किलो मागे ८ रुपये प्रतिभाव मिळत असताना, सरकारच्या बेपर्वाईमुळे ८० रुपये किलो भावाने कांदा घ्यावा लागत आहे, असेही दामू नाईक म्हणाले.

No comments: