Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 13 January, 2011

संपुआ सरकारने देशाला लुटले गडकरींचा घणाघाती आरोप

राष्ट्रीय एकता यात्रेचा दणदणीत शुभारंभ
कोलकाता, द. १२ : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजपने आज कॉंगे्रसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर पुन्हा एकदा शरसंधान साधले. हे सरकार देशाचा खजिना लुटत आहे. भ्रष्टाचार ही कॉंग्रेसची संस्कृतीच बनलेली आहे, असा आरोप करीत, बोङ्गोर्स घोटाळ्यातील आरोपी ओत्ताविओ क्वात्रोची यांचे कॉंगे्रस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्याशी निकटचे संबंध असल्याचा दावा भाजपने केला आहे.
‘‘देशाला पूर्णपणे लुटण्याची मोहीमच कॉंगे्रस पक्षाने हाती घेतली आहे. २-जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या घोटाळ्यात २.५ लाख कोटी रुपयांचा चुराडा झालेला आहे. देशावर सुमारे ५६ वर्षे सत्ता गाजविणार्‍या कॉंगे्रसने प्रत्येकच निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी ‘गरिबी हटाव’ हाच नारा दिला आहे; पण, गरीबी आजही पूर्वी होती तिथेच आहे. किंबहुना, गरिबांच्या संख्येत आणखी वाढ झालेली आहे, श्रीमंत अधिकच श्रीमंत झालेले आहेत. या प्रश्‍नाचे उत्तर कॉंगे्रस पक्षाला द्यावेच लागेल,’’ असे स्पष्ट प्रतिपादन भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
श्रीनगरमधील लाल चौकात येत्या २६ जानेवारी रोजी तिरंगा ङ्गडकविण्याचा निर्धार करून ‘राष्ट्रीय एकता यात्रा’ आज श्रीनगरकडे रवाना झाली. नितीन गडकरी यांनीच झेंडा दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना गडकरी यांनी कॉंगे्रस आणि कॉंगे्रसप्रणित संपुआ सरकारवर घणाघाती टीका केली.
बोङ्गोर्स व्यवहारात कोट्यवधी रुपयांची दलाली घेणारे इटालियन व्यावसायिक क्वात्रोची यांचा १० जनपथशी अगदी जवळचा संबंध होता. क्वात्रोची यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आत्तापर्यंत २७ वेळा भेट दिलेली आहे, अशी कबुली क्वात्रोचींच्या ड्रायव्हरनेच सीबीआयला चौकशीत दिलेली आहे, असा आरोप करून या प्रकरणी सोनियांनी आपली भूमिका शक्य तितक्या लवकर स्पष्ट करायलाच हवी, अशी मागणीही गडकरी यांनी केली.
जनसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यात, त्यांना दिलासा देण्यात संपुआ सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या देशातील सुमारे ५० टक्के लोकांचे दरदिवसाचे उत्पन्न देश स्वातंत्र्यापासून आजही केवळ २० रुपये इतकेच आहे आणि आज त्यांच्यावर ८० रुपये किलो दराने कांदा विकत घेण्याची वेळ आलेली आहे. केवळ कांदाच नव्हे तर अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही त्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, या भीषणतेकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.
एकीकडे गोरगरीब जनता महागाईने त्रस्त झाली असताना कॉंगे्रस मात्र त्याकडे दुर्लक्ष करून व्होट बँकेचेच राजकारण करीत आहे. या राजकारणामुळेच शेजारील बांगलादेशातून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे, असा आरोपही गडकरी यांनी केला.
यात्रेच्या या शुभारंभप्रसंगी डाव्यांचे राज्य असलेल्या पश्‍चिम बंगालच्या राजधानी कोलकाता येथे भाजयुमोने आपले शक्तिप्रदर्शन घडविले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या युवकांना भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीही संबोधित केले.

No comments: