Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 9 January, 2011

‘कलावंत जन्मावा लागतो’

शरद पोंक्षे यांची ‘गोवादूत’ला सदिच्छा भेट

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
कलाकार जन्माला यावा लागतो. अभिनयाचे शिक्षण घेऊन वा पदव्या घेऊन कलाकार होता येत नाही, असे प्रतिपादन विख्यात नाट्यचित्र कलाकार शरद पोंक्षे यांनी आज येथे केले. गोवादूतच्या कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली तेव्हा त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे प्रयोग व पर्वरी येथील शारदा व्याख्यानमालेनिमित्त श्री. पोंक्षे गोव्यात आले आहेत. राष्ट्रप्रेमी विचारांचे कलाकार व जाज्वल्य सावरकरप्रेमी अशी त्यांची ख्याती आहे. ‘गोवादूत’चे संपादक गंगाराम म्हांबरे यांनी त्यांचे स्वागत केले. संचालक सागर अग्नी यांनी ‘गोवादूत’च्या कार्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी अभिनव पब्लिकेशनचे चेअरमन राजेंद्र भोबे, संचालिका ज्योती धोंड, कार्यकारी संपादक सुनील डोळे व गोवादूत परिवारातील कर्मचारी, मणिपाल गोवा इस्पितळातील डॉ. पंकज म्हात्रे व सौ. म्हात्रे उपस्थित होत्या.
नाटक, चित्रपट व मालिका यात फारसा फरक नसतो. मात्र नाटकात प्रेक्षकांसमोर थेट अभिनय करावा लागतो. आर्ट फिल्म व कमर्शियल फिल्म असला काहीही प्रकार नसतो, असेही ते म्हणाले.
मालिकांमधून नकारात्मक विचार प्रक्षेपित होतात का, या ज्योती धोंड यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर श्री. पोंक्षे यांनी नकारात्मक भूमिकेशिवाय नाट्य रंगत नाही म्हणून नकारत्मक विचारांचे एखादे पात्र त्यात असावेच लागत. मात्र लोक शहाणे असल्याने ते चांगले तेच घेतात, असे उत्तर त्यांनी दिले.
संघर्षाशिवाय नाट्य घडत नाही असे सांगून श्री पोंक्षे यांनी एका चाहत्याने, सावरकरांना कैदी म्हणून ठेवलेल्या अंदमानच्या कारागृहातील वाळू आपल्याला भेट दिली तो माझा खरा सन्मान व मिळालेला खास पुरस्कार होता असे ते म्हणाले. माझ्या कलेच्या क्षेत्रातील सर्वोच्च आनंदाचा तो क्षण होता असे सांगून माझी नथुरामची भूमिका मला फार आवडल्याचे त्यांनी सांगितले.
इतर कलावंत भूमिकातून जगत असतील, पण मी भूमिकांमधून जगत नाही तर त्या केवळ साकारतो. ज्यादिवशी भूमिकांतून मला जगावे लागेल त्यादिवशी मी संपेन असे त्यांनी स्पष्ट केले.
बहुतांश वर्तमानपत्रे विकाऊ
सध्याच्या वृत्तसृष्टीबद्दल बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, आजची ९० टक्के वर्तमानपत्रे विकाऊ झाली असून कुणा उद्योगपतीच्या हातातील बाहुले बनली आहेत. ताठ कण्याची पत्रकारिता केव्हाच लोप पावली आहे. वृत्तवाहिन्यांबाबत तर विचारूच नका. ते टाइमपासचे साधन झाल्याची टीका त्यांनी केली. मात्र मुद्रित माध्यमांनी (प्रिंट मीडिया) अजून निदान काही प्रमाणात तरी विश्‍वासार्हता जपली आहे ही त्यातल्यात्यात समाधानाची बाब म्हटली पाहिजे.

No comments: