Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 13 January, 2011

अग्रगण्य उद्योगपतींची गुजरातात १.८० लाख कोटींची गुंतवणूक

गांधीनगर, दि. १२ : गुजरातमधील नरेंद्र मोदी सरकारची कार्यक्षमता आणि धडाडी लक्षात घेऊन देशातील सर्वच अग्रगण्य उद्योगपतींनी त्या राज्यात एकूण १,८०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची आज ग्वाही दिली.
महात्मा मंदिरात आयोजित उद्योगपतींच्या बैठकीत अहमदाबादमधील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या अदानी समूहाने बंदरे, वीजनिर्मिती व पायाभूत सुविधा या क्षेत्रांत ८०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली. दहेज व मुंद्रा येथील बंदरांचा विस्तार आणि विकास करण्यात येत असून २०१५ पर्यंत या बंदरातील उलाढाल २०० दशलक्ष टनांवर जाईल, असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले.
रिलायन्स समूहाचे अनील अंबानी यांनी येत्या ५ - ७ वर्षांत वीज व सिमेंट उत्पादनात ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल, अशी घोषणा केली. कच्छ, पोरबंदर व जुनागढ येथील सिमेंट कारखान्याचा मोठा विस्तार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये एस्सार समूह ३०,००० कोटी, लार्सन ऍन्ड टुब्रो १५,००० कोटी, महिंद्राचे ३,००० कोटी, हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी १,२०० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. ‘व्हायब्रंट गुजरात’ ही उद्योगपतींची दोन दिवसांची परिषद गांधीनगर येथे सुरू असून, पहिल्याच दिवशी प्रचंड गुंतवणुकीची घोषणा अनेक उद्योगपतींनी आज केली.
--------------------------------------------------------------------
रिलायन्स समूहाचे अनिल अंबानी यांनी भाषण करताना, आदरणीय रतन टाटा असा प्रथम उल्लेख केला, नंतर, ‘माझे थोरले बंधू मुकेश’असे त्यांनी म्हटल्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर हे अंबानी बंधू गुजरातमध्ये एकत्र आले आहेत.

No comments: