Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 3 December, 2010

महानंदच्या पथ्यावर त्रुटी, पळवाटा आणि दिशाभूल...


प्रीतेश देसाई

पणजी, दि. २
गोव्याला हादरवून सोडणारा ‘सीरिअल किलर’ महानंद नाईक एका मागोमाग एक खुनांच्या खटल्यांतून सुटत असल्याने समस्त गोमंतकीयांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. पिडीत तरुणींच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना तो दोषी असल्याचे माहीत असतानाही पोलिस तपासकामात राहिलेल्या त्रुटी आणि कायद्याच्या पळवाटांचा पुरेपूर फायदा उठवत आत्तापर्यंत महानंद सात खुनाच्या खटल्यातून दोषमुक्त झाला आहे. तर, एकाच बलात्कार प्रकरणात त्याला सात वर्षांची शिक्षा झाली आहे. यामुळे महानंद हा चार्ल्स शोभराज याचाही ‘बाप’ असल्याचे न्यायालयात बोलले जात आहे.

‘डीएनए’ चाचणीचा लाभ उठवला...
महानंदच्या नावावर सध्या १६ खुनांची नोंद झाली आहे. आणि हे सर्व खून त्यानेच केले आहेत, हे तेवढेच सत्य आहे. कारण, त्यानेच दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी विविध ठिकाणी शोध घेऊन हाडांचे सापळे ताब्यात घेतले होते. आपण अमुक ठिकाणी अमुक तरुणीचा खून करून मृतदेह टाकला आहे, अशी माहिती महानंदकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी शोध घेतला असता त्यांना तरुणींची हाडे सापडली होती. परंतु, हेतुपुरस्सर त्याने पोलिसांची दिशाभूल करताना, ज्या तरुणीला मारले होते तिचे नाव न सांगता अन्य ठिकाणी मारलेल्या तरुणीचे नाव पोलिसांना सांगितले. यामुळे त्या तरुणीच्या हाडांची ‘डीएनए’ आणि तिच्या कुटुंबीयांची ‘डीएनए’ चाचणी नकारात्मक आली, नेमका याचाच महानंदला लाभ झाला. आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू नये, यासाठी त्याने आधीच याची खबरदारी घेतली होती, असे यामुळे स्पष्ट होते.

का सुटतोय महानंद..?
महानंद प्रकरणातील बहुतेक खून हे १९९४ साली झाले आहेत. त्यामुळे पुरावे गोळा करणे हे पोलिसांसाठी बरेच कठीण काम होते. सापडलेली हाडेही जीर्ण झाली होती. त्यांची ‘डीएनए’ चाचणी करून मोठा फायदा होणार नव्हता. ‘डीएनए’ चाचणीत मयत व्यक्तीची हाडे, केस, त्वचा याची चाचणी करून ते नमुने तिच्या कुटुंबीयांशी जुळतात का, हे पाहिले जाते. परंतु, गुन्हे करण्यात ‘माहीर’ असलेल्या महानंदने आधीच ही शक्यता ओळखून खून केलेल्या तरुणीचे नाव आणि ज्या ठिकाणी तिला मारून टाकले त्यांची जुळवाजुळव होणार नाही, याची काळजी घेत मृतदेह पोलिसांना दाखविले. यामुळे या चाचणीचा न्यायालयात मोठा फायदा झाला नाही, असे सरकारी वकील सुभाष सावंत देसाई यांनी सांगितले.
साक्षीदाराने पाठ फिरवली...
महानंदला फाशीपर्यंत नेण्यासाठी साक्षीदाराची साक्ष अत्यंत महत्त्वाची होती. तरुणींच्या अंगावरील चोरीचे दागिने विकत घेणार्‍या सोनाराने महानंदच्या विरोधात साक्ष दिली असती तर, किमान ४ प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असती, असे ऍड. देसाई यांनी सांगितले. पोलिसांनी फोंडा येथील एका सोनाराकडून दहा लाख रुपयांचे सोने जप्त केले होते. परंतु, त्या सोनाराने महानंदच्या विरोधीत साक्ष दिली नाही. महानंदच्या विरोधात साक्ष दिली तर, आपल्याकडील सोने हे कायद्याने मयत तरुणींच्या कुटुंबीयांना द्यावे लागेल, या भीतीनेच त्याने साक्ष दिली नाही, असे ऍड. सावंत यांनी पुढे सांगितले.

No comments: