Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 1 December, 2010

राजीव दीक्षित यांचे आकस्मिक निधन

रायपूर, दि. ३० - आझादी बचाओ आंदोलनाचे प्रणेते आणि युवा सामाजिक क्रांतिकारक राजीव दीक्षित यांचे आज छत्तीसगड मुक्कामी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४४ वर्षांचे होते. विशेष म्हणजे दीक्षित यांचा आजच वाढदिवसही होता.
विदेशी कंपन्यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवून स्वदेशीचा पुरस्कार करण्याच्या कामी राजीव दीक्षित यांनी मोलाचे योगदान दिले. स्वदेशी वस्तूंच्या प्रचार-प्रसाराचे काम ते सातत्याने करीत होते. यासाठीच ते छत्तीसगडच्या दौर्‍यावर आले होते. रात्री ते भिलईत थांबले होते. अचानक त्यांना छातीत दुखू लागले. त्यांना तातडीने जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तेथून त्यांना रायपूर येथील अपोलो बीएसआर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथेच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.
तेथून त्यांचे पार्थिव विशेष विमानाने रायपूर येथील डॉ. आंबेडकर हॉस्पिटल येथे आणण्यात आले. दुपारनंतर त्यांचे पार्थिव हरिद्वार येथे पोहोचले. राजीव दीक्षित हे बाबा रामदेव यांच्या भारत स्वाभिमान आंदोलनाचे सचिव म्हणून कार्यरत होते. रामदेवबाबांच्या शिबिरांमध्ये ते व्याख्यान देत असत.

स्वदेशीसाठी लढा
उत्तरप्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेले राजीव दीक्षित यांचे घराणेच क्रांतिकारकांचे आहे. तोच बाणा त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवला. वयात आल्यापासून त्यांनी विदेशी कंपन्यांविरुद्ध जणू लढाच पुकारला होता. विदेशी कंपन्यांच्या उत्पादनांना शह देण्यासाठी त्यांनी स्वदेशी कंपन्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची चळवळच उभारली. या लढ्यासाठी त्यांना पेप्सी, कोला अशा मोठमोठ्या कंपन्यांचा कोर्टात सामना करावा लागला. पण, त्यांनी प्रयोगशाळेत चाचण्या करून ही सर्व शीतपेये किती विषारी आणि हानिकारक आहेत, हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखविले. ते शास्त्रज्ञ होते आणि फारच थोड्या लोकांना माहिती असेल की, त्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांसोबत काम केले होते. टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रात त्यांनी फ्रान्समध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम केल्याचीही नोंद आहे.

मुख्यमंत्री रमणसिंग यांनी घेतले अंत्यदर्शन
छत्तीसगडमध्ये कालवश झालेले राजीव दीक्षित यांच्या पार्थिवाचे आज मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग यांनी अंत्यदर्शन घेतले आणि त्यांना आदरांजली वाहिली. स्वदेशी प्रचाराच्या क्षेत्रात दीक्षित यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, अशा शब्दात डॉ. रमणसिंग यांनी आपली संवेदना व्यक्त केली.
दीक्षित यांच्या निधनाची वार्ता देशभरात वार्‍यासारखी पसरली. सर्व स्तरातून त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले जात आहे.

No comments: