Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 29 November, 2010

जेपीसी चौकशीच्या मागणीवर भाजप अजूनही ठाम

स्पेक्ट्रम घोटाळा

अहमदाबाद, दि. २८ - संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या आणि संसदेचे कामकाज रोखून धरणाऱ्या २ जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशीची मागणी आम्ही करणारच असून यावर यापुढेही ठाम राहणार असल्याची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली आहे.
पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले की, आम्ही सातत्याने ही मागणी केली आहे. पण, कॉंग्रेसने जेपीसीमार्फत चौकशीला टाळण्याचाच प्रयत्न केलाय. त्यामुळेच संसदेचे कामकाज ठप्पच आहे. कॉंग्रेसने आपला हेका सोडला तर संसदेचे कामकाज सुरळीत होईल.
विरोधी पक्ष अन्य कोणता विरोधाचा मार्ग पत्करू शकत नाही का, असे विचारले असता जावडेकर म्हणाले की, आमच्या पक्षाने कोणतीही घटनाबाह्य मागणी केलेली नाही. जिथे ही मागणी केली ते ठिकाणही बेकायदेशीर नाही. केवळ भाजपाच नव्हे तर सर्वच विरोधी पक्षांनी ही मागणी केली आहे. त्यात संसदीय परंपरेचा अपमान अजीबात झालेला नाही, असेही भाजपा प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
संसदेचे कामकाज ठप्प झाल्याने आपला दैनंदिन भत्ता न उचलण्याचा निर्णय कॉंग्रेस सदस्यांनी घेतला आहे. याविषयी बोलताना जावडेकर म्हणाले की, स्पेक्ट्रम घोटाळ्यात १.७६ लाख कोटी रुपये, राष्ट्रकुल घोटाळ्यात ३० हजार कोटी रुपये आणि आदर्शमध्येही हजारो कोटी गट्ट केल्यानंतर आता कॉंग्रेस सदस्य भत्ता न घेण्याचा गोष्टी करीत आहेत. इतका पैसा गिळंकृत केल्यानंतर कॉंग्रेसला भत्त्याची गरजच काय, असा सवालही जावडेकर यांनी केला.

No comments: