Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 1 December, 2010

तारीवाडा वसाहतीतील कुटुंबांना पुनर्वसन समितीकडून नोटिसा

वास्को, दि. ३० (प्रतिनिधी) - तब्बल १२ वर्षांपूर्वी तारीवाडा, बोगदा येथे दरड कोसळून बेघर झालेल्या कुटुंबांपैकी ७२ कुटुंबांना दोन वर्षांपूर्वी गोवा पुनर्वसन समितीने बोगदा येथे बांधलेल्या वसाहतीत कायम घरे दिल्यानंतर यांपैकी २३ कुटुंबांना आज नोटिसा जारी केल्याने ते संतप्त बनले आहेत. सदर वसाहतीतील घरांत पावसात पाणी शिरत असल्यामुळे सुरक्षेसाठी तसेच अन्य कारणामुळे काहींनी घराच्या आत व बाहेर बांधकाम केले असून आज त्यांपैकी बहुतेकांना केलेले बांधकाम पाडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. त्यामुळे सदर कुटुंबांनी
याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुनर्वसन समितीने जारी केलेल्या नोटिशीत ह्या परिवारांनी समितीच्या परवानगीशिवाय घरात मोठ्या प्रमाणात बदल केल्याचे नमूद केले असून यातून वसाहतीतील इमारतींना धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे. एका महिन्याच्या आत घराच्या अंतर्भागात केलेले बांधकाम पाडण्यात यावे; अन्यथा पुनर्वसन समितीला कारवाई करावी लागेल असेही म्हटले आहे.
दरम्यान, आज दुपारी सदर परिवारांना नोटिसा देण्यात आल्यानंतर ही कुटुंबे बिथरली असून उद्या संध्याकाळी यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सदर प्रकाराबाबत ‘तारीवाडा हाऊझीस सोसायटी’चे अध्यक्ष शेख अब्दुल बासीद यांच्याशी संपर्क साधला असता गोवा पुनर्वसन समिती येथील नागरिकांची सतावणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या घरांत पावसाळ्यात घरात पाणी शिरायचे, छपराला भेगा पडल्या होत्या व त्यामुळेच त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक होते, असेही ते म्हणाले. यापूर्वी बांधकाम करण्यासंबंधी परवानगी मागण्यात आली होती. मात्र ती अजूनही दिली नसल्याचेही ते म्हणाले.

No comments: