Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 6 August, 2010

लेनला महानायक समजलाच नाही!

पन्हाळ्याला महाराज अडकलेले असताना इंग्रजांनी दगाबाजी करून सिद्दी जोहरतर्फे स्वतःचे गोलंदाज लावून तोफा डागल्या होत्या. महाराजांच्या भेटीला नंतर साळसूदपणे आलेल्या इंग्रजी वखारीच्या प्रमुखाला व त्याच्या तीन साथीदारांना महाराजांनी कैद केले. इंग्रजांच्या वखारीची मराठ्यांनी लूट केली. महाराजांनी कैद करून ठेवलेल्या एका कैद्याने-अँड्रुजने आपल्या देशबांधवांना समज दिली-"कंपनीच्या मालाचे रक्षण केले म्हणून ही कैद प्राप्त झाली नसून, पन्हाळ्याच्या वेढ्यात जाऊन इंग्रजांचा बावटा फडकावून गोळे उडविल्याबद्दलचे हे प्रायश्चित्त आहे. शिवाजी नसता आणि दुसरा कोणी असता तरी ज्याला म्हणून आपल्या अत्याचाराबद्दल सूड उगविण्याचे सामर्थ्य आहे, तो असाच वागला असता. व्यापाऱ्यांनी दारूगोळ्यासारखा माल विकायचा नसतो किंवा शत्रू सैन्यावर उडवायचा नसतो.' (पत्र- दि. २० मार्च १६६२ शि.प.सा.स.पृ.क्र.८७४)
महाराजांच्या सुटकेचे वृत्त डच वखारीच्या वाकनिसाने पेट हेगच्या गव्हर्नरला पाठविले होते. त्याची प्रत उपलब्ध आहे (शिवकालीन पत्र सार संग्रह खंड, पत्रक ८३१). ही घटना Story नव्हे history आहे आणि त्यात Legendary potential तर आहेच.
महाराजांनी नेताजींना हिंदू धर्मात परत घेतले याची नोंद जेम्सने केली आहे. (पृ. ३८) महाराज त्याच्यापुढे एक पाऊल जातात. गोव्यात पोर्तुगिजांनी जुलमाने धर्मांतर केल्याचे लक्षात आल्यावर तो जुलूम करणाऱ्या पाद्÷यांना हिंदू धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती केल्याचे वृत्त गोव्यावरून पाठविलेल्या पत्रात मिळते ते असे - गोव्याच्या व्हाईसरॉयने रोमन कॅथलिक धर्म वगळून इतर धर्माच्या माणसांना हद्दपारीचा हुकूम काढल्यामुळे क्रुद्ध होऊन शिवाजीने गोव्यानजीक बार्देशच्या सरहद्दीवर स्वारी केली व तेथील चार पाद्री लोकांनी सर्वधर्मीयांव्यतिरिक्त इतरांचा प्राणनाश करण्याचा सल्ला दिला होता. (हे लक्षात घेऊन) त्यांनी स्वतः शिवाजीचा मराठा (हिंदू) धर्म स्वीकारण्याचे नाकारल्यामुळे (that refused to turne moretto's (Marathas) of his own persuasion) शिवाजीने त्यांचा शिरच्छेद केला. त्यामुळे घाबरून जाऊन व्हाईसरॉयने आपला क्रूर आणि कडक हुकूम परत घेतला.' (गोव्यावरून पाठविलेले पत्र दि. ३० नोव्हें. १६६७, शि.का. प. सा. सं. खंड १ पृ ३३१ पत्र क्र. ११८६).
जर ते पाद्री हिंदू झाले असते तर महाराजांनी त्यांना धर्म बहिष्कृतीचे जीवन जगण्याऐवजी हिंदू समाजात प्रतिष्ठित केले असते आणि एक नवा पायंडा पडला असता. महाराजांचे थोरपण केवळ सांस्कृतिक किंवा राजकीय क्षेत्रांपुरतेच मर्यादित नव्हते. ते तांत्रिक क्षेत्रातही दूरदृष्टी ठेवून होते. इतर कोणत्या राज्यकर्त्याने केले नसेल ते तोफा ओतण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. (जयसिंगाचे औरंगजेबाला पत्र शि. प. सा. सं. खं. १ पृ २१६ पत्र क्र. १०५३). स्वराज्यात व्यवस्थित काम व्हावे यासाठी एक इंजिनिअर गुप्तपणे पाठविण्याची अट मुंबईच्या इंग्रजी गव्हर्नरला घातली होती. (मुंबई-सुरत पत्र व्यवहार शि. प. सा. सं. खं. २ पृ ३९६ पत्र क्र. १४०९ दि. ९ सप्टें. १६७१). इतर कुठल्याही मुस्लीम शाहीने केली नव्हती त्या सागरी आरमाराची, नौदलाची आणि सागरी किल्ल्यांची निर्मिती महाराजांनी केली. या सर्वांचा उल्लेख लेन करत नाही.
शाईस्ताखानाची बोटे कापण्याच्या प्रसंगापूर्वी मोगल सेनापतीलाच खिंडीत जाऊन पराजयाचा हिसका दाखविण्याचे आणि हिंदूंच्या जनमानसात आदिलशहा काय किंवा मोगल काय यांना हिंदू पराजित करू शकतात ही भावना निर्माण करण्याचे काम महाराजांनी केले. शाईस्ताखानाच्या आदेशानुसार उंबर खिंडीतून खाली उतरण्यापूर्वीच महाराजांनी स्वतः रणांगणावर जाऊन करतलब खानाचा पाडाव केला. त्याच्या सैन्याची दाणादाण केली. शत्रूशी समोरासमोर लढाई करून त्याला पराभूत केले.
लेनने दिलेल्या चार प्रसंगांव्यतिरिक्त वरील प्रसंग देण्याचे कारण म्हणजे महाराजांच्या आयुष्यात केवळ जेम्स लेनने दिलेले तीन चार प्रसंग घडलेले नसून इतर कितीतरी प्रसंग त्या इतिहासाचा अविभाज्य भाग बनले आहेत. यातील एकेक प्रसंगानेही महाराजांची कीर्ती पसरली असती. तसे अनेक प्रसंग घडले आणि म्हणूनच लेन लिहितो त्याप्रमाणे सतराव्या शतकाच्या काळातच त्याच्या जीवंतपणी महाराज महानायक Epic hero बनले होते.
जेम्स जरी good story बनवण्याच्या दृष्टीने त्या वेळच्या पुराव्यांचे साहित्याचे विश्लेषण करतो असे लिहितो तरी त्याने केवळ २-४ च साधने उपयोगात आणली आणि त्यांच्या आधारेही महानायकाचे चरित्र समजून घेताना त्याने घोडचुका केल्या आहेत.

No comments: