Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 November, 2009

कांगारूंना दणका...

मालिकेत भारताची २-१ आघाडी
युवीची बॅट तळपली

नवी दिल्ली, दि. ३१ : श्वास रोधून धरायला लावणाऱ्या अत्यंत उत्कंठावर्धक लढतीत आज येथील फिरोजशहा कोटला स्टेडियमवर हजारो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने यजमान भारताने पाहुण्या कांगारूंवर सहा गडी राखून दिमाखदार विजय नोंदवला आणि सात सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी सुखद आघाडी घेतली. धडाकेबाज ७८ धावा काढून त्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण बळी मिळवलेला युवराजसिंग हा यजमानांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाबाद ७० धावा करून तेवढीच समर्थ साथ दिली आणि भारताने पाहता-पाहता विजयाचा सोपान सर केला तो तब्बल दहा चेंडू शिल्लक असताना..
पहिल्यांदा फलंदाजी केलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताने झकास मारा करून २२९ धावांतच रोखले. यजमानांच्या विजयाच्या आशा तेथेच प्रफुल्लीत झाल्या. तथापि, नंतर जेव्हा भारतीय संघ मैदानात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा उण्यापुऱ्या साठ धावांतच आघाडीचे तिघे फलंदाज तंबूत परतले. त्यामुळे रसिकांच्या काळजात धस्स झाले. आता विजय काहीसा दूर गेला, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. तथापि, युवीची बॅट तळपली आणि पुन्हा विजयाच्या सावल्यांनी कोटला स्टेडियमभोवती फेर धरला तो शेवट गोड होईपर्यंत. या मालिकेतील चौथा सामना आता येत्या सोमवारी (२ नोव्हेंबर ०९ रोजी) दिवसरात्र पद्धतीने मोहाली येथे रंगणार आहे.

No comments: