Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 2 November, 2009

नक्षलवाद्यांच्या बिमोडासाठी केंद्रातर्फे विशेष मोहीम

नवी दिल्ली, दि. १ - वाढता नक्षलवाद आणि नक्षली गटांचे अतिरेक्यांशी निर्माण झालेले लागेबांधे लक्षात घेता केंद्र सरकारने नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह अन्य नक्षलग्रस्त राज्यांमध्ये ही विशेष मोहीम लवकरच राबविण्यात येणार आहे.
नक्षलविरोधी विशेष मोहिमेसाठी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा आणि पश्चिम बंगाल ही सहा राज्ये निश्चित करण्यात आली आहेत. सशस्त्र पथके एकमेकांमध्ये समन्वय राखून एकाचवेळी या राज्यांमध्ये कारवाई करून नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यास सुरुवात करणार आहेत. नक्षलविरोधी लढा देणाऱ्या पोलिसांचे हात अधिक बळकट करण्याचा आणि त्यांच्या मदतीला आणखी ४० हजार निमलष्करी दलाच्या जवानांची फौैज देण्याचा निर्णय झाला आहे. या शिवाय जंगलातील युद्धाचा अनुभव असणारे सात हजार सैनिक कारवाईत सहभागी होतील. कारवाई सुरू असताना स्थानिकांचे सहकार्य मिळावे यासाठी नक्षलप्रभावित जिल्ह्यांच्या विकासाकरिता ७ हजार ३०० कोटींचे पॅकेज तयार करण्यात आले आहे.
विशेष मोहिमेअंतर्गत निश्चित केलेल्या राज्यातील नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी कारवाई करून नक्षलवाद्यांची कोंडी करण्यात येणार आहे. त्यांचे आर्थिक स्रोत बंद करण्यात येतील. तसेच त्यांना शस्त्रे आणि दारूगोळा पुरविणारे मार्ग शोधून ते कायमचे नष्ट केले जातील. सर्व प्रकारे कोंडी करून नक्षलवाद्यांसाठी शरण या किंवा मरा अशी स्थिती निर्माण केली जाणार असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले आहे.
सध्या नक्षलवाद्यांनी देशातील सुमारे ४० हजार चौरस किलोमीटर इतक्या परिसराला व्यापले असून येत्या १२ ते ३० महिन्याच्या कालावधीत या विशेष मोहिमेद्वारे त्यांचा खात्मा केला जाणार आहे.

No comments: