Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 5 November, 2009

...तर देशव्यापी आंदोलन

वंदे मातरम्विरोधी फतव्याबाबत विहिंपचा सरकारला इशारा

'नागरिकत्व रद्द केले पाहिजे'

नवी दिल्ली, दि. ४ : "वंदे मातरम्'ला विरोध करून राष्ट्रविरोधी कृत्य करण्याच्या देवबंदच्या फतव्याचा विश्व हिंदू परिषदेने तीव्र निषेध केला आहे. देवबंदचा फतवा हा राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप करून, जमात-उलेमा-ए-हिंदने हा फतवा जारी करून पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रविरोधी चरित्राचे दर्शन घडविले आहे. केंद्र सरकारने जर या संघटनेविरुद्ध कारवाई केली नाही, तर मग विहिंप देशव्यापी आंदोलन उभारेल, असा इशारा विहिंपचे सरचिटणीस प्रवीण तोगडिया यांनी दिला. देवबंदमध्ये झालेल्या या उलेमा संमेलनाशी निगडित सर्व लोकांचे नागरिकत्व रद्द केले पाहिजे, अशी जोरदार मागणी तोगडिया यांनी केली.
असा अराष्ट्रीय ठराव करणाऱ्या संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल गृहमंत्री चिदंबरम यांनी देशवासीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. अशा राष्ट्रविरोधी कृतीचा निषेध करण्याऐवजी, मी त्यावेळी तेथे उपस्थित नव्हतो, असे सांगून सारवासारव करणे हे तर अधिकच आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुस्लिमांनी फतव्याचा जोरदार विरोध करावा : स्वामी
वंदे मातरम्ला विरोध करणाऱ्या देवबंदच्या फतव्याचा देशभरातील मुस्लिम बांधवांनी जोरदार विरोध करावा, असे आवाहन जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केले आहे. देवबंदने काढलेला फतवा हा संविधानाची पायमल्ली करणारा असल्यामुळे हे कृत्य भादंविच्या कलमाखाली कारवाई करता येण्याजोगे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मुस्लिम नेत्यांनी आमचे राष्ट्र आणि संविधान हे आमच्या धर्मापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे जाहीर केले पाहिजे, असे आवाहन स्वामी यांनी केले आहे.
चिदंबरम यांनी माफी मागावी : भाजप
वंदे मातरम् च्या विरोधात देवबंदने फतवा काढण्याच्या वेळी मी उपस्थित नव्हतो, हे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे विधान मुळीच समर्थनीय नसल्याचे नमूद करीत देवबंदच्या संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल चिदंबरम यांनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
जमात-उलेमा-ए-हिंदने वंदे मातरम् विरोधात फतवा काढल्याच्या घटनेचा कालच भाजपने तीव्र विरोध दर्शविला होता. चिदंबरम हे देशाचे गृहमंत्री आहेत आणि ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात काय होणार आहे, याबाबतची माहिती त्यांना आधीच दिली गेली असणार. तेव्हा त्यांनी केलेली सारवासारव मुळीच समर्थनीय नाही, असे भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले आहे.
आज देशात दहशतवाद, विघटनवाद आणि नक्षलवाद फोफावत असताना, ज्या कार्यक्रमात "वंदे मातरम्'चा अपमान होणार आहे, अशा कार्यक्रमाला गृहमंत्र्यांनी उपस्थित राहणे, हेच आश्चर्यकारक असल्याचे नकवी यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात "वंदे मातरम्' विरोधात फतवा काढला जाणार आहे, हे जर चिदंबरम यांच्या गुप्तवार्ता यंत्रणेला माहीत नसेल तर या देशाचे काय होईल, अशी टीका नकवी यांनी केली आहे.
चिदंबरम यांनी हात झटकले
जमात उलेमा-ए-हिंदच्या देवबंद येथील संमेलनात "वंदे मातरम्'च्या विरोधातील फतवा माझ्या उपस्थितीत संमत झाला नाही, असा स्पष्टीकरणादाखल खुलासा केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिला आहे.
चिदंबरम यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही बाब नमूद करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, ३ नोव्हेंबर रोजी गृहमंत्री पी. चिदंबरम देवबंद येथे जमात उलेमा-ए-हिंदच्या संमेलनात सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान उपस्थित होते. या कालावधीत कोणताही प्रस्ताव संमत झाला नव्हता. जेव्हा त्यांचे भाषण झाले, तेव्हाही त्यांना "वंदे मातरम्' किंवा अन्य कोणत्याही विषयावरील प्रस्तावाविषयी माहिती नव्हती. याशिवाय, महिला आरक्षणाविषयीदेखील विरोधात्मक प्रस्ताव मुस्लिम संघटनेसमोर असल्याची कल्पनाही आपल्याला नव्हती. गृहमंत्र्यांच्या लेखी भाषणावरून भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी टीकेची झोड उठविली. पण, ते भाषण पूर्वीपासूनच तयार केलेले होते. त्याक्षणी त्यांनी वेळेवर दिलेले भाषण नव्हते, असेही स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जमात उलेमा-ए-हिंदच्या संमेलनात काल समारोपाच्या दिवशी "वंदे मातरम्'विरोधी प्रस्ताव संमत झाला. देशभरातील सुमारे १० हजार उलेमांनी एकमताने हा प्रस्ताव संमत केला. या कार्यक्रमात खुद्द गृहमंत्री पी. चिदंबरम उपस्थित होते. त्यामुळे भाजप, शिवसेनेसह अन्य हिंदुत्ववादी पक्षांनी चिदंबरम यांच्यावर टीका केली होती.
सपाचा मुस्लिम फतव्याला पाठिंबा
'वंदे मातरम्'ला मुस्लिमांचा विरोध नाही. पण, हे गीत म्हणणे त्यांच्या धार्मिक भावनांच्या आणि समजुतींच्या विरोधात असल्याने भाजपने या मुद्याचे राजकारण करू नये, असे समाजवादी पार्टीने म्हटले आहे. सपाचे महासचिव अमरसिंग पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "वंदे मातरम्' म्हणण्यास मुस्लिमांच्या काही धार्मिक समजुती परवानगी देत नाहीत. पण, याचा अर्थ या मुद्यावरून भाजप किंवा अन्य पक्षांनी राजकारण करावे असा होत नाही. यातून काहीतरी मधला मार्ग काढला पाहिजे. या मुद्याचे राजकारण केले तर दोन समुदायांमधील दरी वाढतच जाईल.
शिवाय, जमात उलेमा-ए-हिंदच्या संमेलनात उपस्थित राहिल्याबद्दल गृहमंत्री पी. चिदंबरम यांना दोषीही मानले जाऊ नये, असेही अमरसिंग म्हणाले.
मुस्लिम नेत्यांच्या प्रतिक्रिया
खरे तर "वंदे मातरम' चा वाद उरकून काढण्याचे काहीच कारण नव्हते, हा मुद्दा का उपस्थित झाला, हेच मला कळत नाही. याहून अधिक गंभीर समस्या या समाजापुढे आहेत, अशी प्रतिक्रिया जामा मशिद युनायटेड फोरमचे याह्या बुखारी यांनी नवी दिल्ली येथे व्यक्त केली. वंदे मातरमची सक्ती कोणीही मुस्लिमांवर करीत नसताना, विनाकारण हा वाद सुरू करण्यात आला आहे. केवळ प्रसारमाध्यमाचे लक्ष वेधण्यासाठी हे केले जात आहे, असे बुखारी यांनी पुढे सांगितले. हे गीत केवळ अभिवादन करण्यासाठी असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही असे सांगून मुस्लिम देशावर प्रेम करतात पण पुजा करीत नाहीत, तरीही हा श्रद्धेचा विषय आहे, असे ते म्हणाले. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य एस.आर.इल्यसी यांनीही हीच भूमिका मांडली. आताच याबद्दल का बोलले जात आहे, हे आपल्याला समजत नाही, असे ते म्हणाले.

No comments: