Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 November, 2009

भक्तिरसात न्हाली दिंडी मिरवणूक...

मडगाव, दि. ३१ (प्रतिनिधी) : येथील श्री हरी मंदिरातील शताब्दी दिंडी महोत्सवाची दिंडी मिरवणूक "ज्ञानबा तुकाराम'च्या गजरात आणि टाळमृदंगाच्या तालावर नाचत गाजत उत्साहात काढण्यात आली. महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गातील बागवाडी विकास मंडळाचे वारकरी पथक अग्रभागी होते. शंभर वर्षांत प्रथमच गोमंतकीय पारंपरिक खाजे, लाडू, फुटाणे, शेंगदाणे व खेळाच्या वस्तू विकणाऱ्या व्यवसायिकांना दुकाने थाटण्यास रस्त्यावरील जागा न दिल्याने त्यांनी बहिष्कार घातला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या बॉंबस्फोटामुळे यावेळी सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली होती.
आज सायंकाळी ६.३० वाजता सजवलेल्या वाहनात श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती विराजमान झाली व वारकरी संप्रदायाने जयघोषात टाळमृदंगाच्या तालावर नाचत गात तिचे स्वागत केले. त्यानंतर सुप्रसिद्ध रघुनंदन प्रभाकर पणशीकर यांची श्री हरी मंदिरासमोर गायनाची पहिली बैठक झाली. त्यांनी "जयजय रामकृष्ण हरी' या गजराने व "पालखीच्या संगे आज मन माझे नाचे' या सुमधूर आवाजात भजनाने केली. त्यानंतर "अहो नारायणा, मुरलीधर नंदलाल हेच भक्तीगीताने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
मध्यंतराला मुख्यमंत्री तथा शताब्दी दिंडी उत्सव समितीचे अध्यक्ष दिगंबर कामत यांनी पुष्पगुच्छ देऊन गायकांचे स्वागत केले. ही बैठक रात्री नऊपर्यंत रंगली. त्यानंतर युको बॅंकेजवळ दुसरी बैठक व तिसरी बैठक नगरपालिका चौकात झाल्यावर पहाटे १ वाजता दारुकामाची आतषबाजी झाली.
या बैठकीत सुप्रसिद्ध गायिका आशा खालिलकर यांचे गायन झाले. त्यांना भरत कामत, दयासिद्धेश कोसंबे यांनी तबला, राया कोरगावकर व महेश धामसकर यांनी संवादिनीची साथ दिली.
श्रींचे दिंडी संचलन रात्रौ ९ वाजता लिली गार्मेटजवळून नवा बाजार, ते युकोबॅंक तेथून नगरपालिका चौक व ती बैठक संपताच पहाटे आबाद फारिया रस्त्यावरून दामोदर साल येथून कोंब येथील विठ्ठल मंदिरात पोहोचली. तेथील विठ्ठलाची भेट झाल्यानंतर ती परतीच्या मार्गाला लागली. वाटेत व्यापारी व लोकांनी समया लावून श्रींचे स्वागत केले. हरी मंदिरापासून कोंबपर्यंतचा परिसर पताका व विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता.
दरम्यान, हरी मंदिराजवळ चणे विकायला आलेल्या गोमंतकीय विक्रेत्यांना पालिकेच्या निरीक्षकाने हाकलून लावले. गोमंतकीय विक्रेत्यांना फेरी घालण्यास मज्जाव केला. मात्र परप्रांतीय विक्रेते नव्या बाजारात उद्यानाजवळ बसलेले होते. विठ्ठल मंदिराजवळ विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
सुरक्षिततेसाठी गोव्यातील ६५० पोलिसांचा तैनात केले होते. त्यांत वाहतूक पोलिस, अधिकारी यांचा भरणा होता. त्याशिवाय ७ दिप मनोरे उभारून कॅमेरा घेवून पोलिस तैनात होते. प्रत्येक ठिकाणी रस्ते अडविल्याने वाहनांची तपासणी करीत असल्याने दिंडी उत्सावाला जाण्याचे कित्येकांनी टाळले. पोर्तुगीज काळांतही ही दिंडीला स्वातंत्र्य होते मात्र शंभराव्या वर्षी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने उत्सहावर विरझण पडले.

No comments: