Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 3 November, 2009

सरकारच्या अनास्थेमुळे महामार्गाचे काम रखडले

पणजी-अनमोड रस्ता
पणजी,दि.२(प्रतिनिधी): पणजी ते अनमोड या राष्ट्रीय महामार्ग ४ (अ) च्या चौपदरीकरणाचे कंत्राट भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 'आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' या कंपनीला बहाल करून चार महिने उलटले खरे; पण राज्य सरकारच्या अनास्थेमुळे हे काम रखडल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ (अ) च्या चौपदरीकरणाचे काम भूसंपादनामुळे रखडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी नियोजित रस्त्यासाठीची किमान ९० टक्के जागा सरकारच्या ताब्यात असणे आवश्यक आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात केवळ ६८ टक्के जागा आहे. उर्वरित जागा संपादित करण्याचे काम राज्य सरकारने तातडीने करण्याची गरज आहे. मात्र याप्रकरणी राज्य सरकारला काहीही पडून गेले नाही, अशा आविर्भावातच सरकार वागत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. राज्य सरकारकडून अद्याप स्टेट सपोर्ट अग्रीमेंट (राज्य सहकार्य करार) करण्यास हयगय करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या कराराद्वारे या कामासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत सर्व प्रशासकीय सहकार्य देण्याची हमी राज्य सरकारला द्यावी लागते. सुमारे ६९ किलोमीटरचे अंतर असलेल्या या रस्त्याचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. या चौपदरीकरणामुळे गोवा कर्नाटक दरम्यान वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्याकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र या कामाकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून पुढाकार घेतला जात नाही. अलीकडेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या प्रकल्पाला चालना देण्यासाठी गोव्यात दाखल झाले असता त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याकडून योग्य ते सहकार्य मिळाले नसल्याने ते परत गेल्याचीही खबर मिळाली आहे. राज्य सरकार या नियोजित प्रकल्पाबाबत अजिबात गंभीर नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

No comments: