Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 7 November, 2009

विकासबाह्य क्षेत्रातच ६०० खोल्यांचा प्रकल्प

चिखलीवासीयांचा आंदोलनाचा इशारा
पणजी, दि. ६(प्रतिनिधी): चिखली ग्रामपंचायत क्षेत्रातील दाबोळी माटवे येथे हिरव्यागार डोंगरावर "डीएलएफ'तर्फे सुमारे ६०० खोल्यांचा मेगा रहिवासी प्रकल्प उभा राहत आहे. नियोजित प्रादेशिक आराखडा २०२१ अंतर्गत हा भाग विकासबाह्य क्षेत्र म्हणून दाखवण्यात आला असताना या प्रकल्पाला कोणत्या आधारावर परवाने देण्यात आले, असा सवाल करून हे परवाने तात्काळ मागे घ्या अन्यथा चिखली ग्राम कृती समितीच्या मदतीने गोवा बचाव अभियान आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला.
आज इथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत गोवा बचाव अभियानाच्या सहनिमंत्रक सबिना मार्टीन्स यांनी ही माहिती दिली. यावेळी सचिव रिबोनी शहा, मुरगावचे नागरिक एडविन मास्कारेन्हस, चिखली ग्राम कृती समितीचे रुई आरावझो आदी हजर होते. याठिकाणी विकासबाह्य क्षेत्र असतानाही मुख्य नगर नियोजकांनी डोंगरकापणीचा परवाना कसा दिला, असा आरोप करून हजारो वृक्ष तोडले जात असताना वन खातेही डोळ्यांवर हात ठेवून गप्प आहे, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. या भूखंडाचे रूपांतर झाले नसतानाही उपभूखंड तयार करण्यात आले आहेत. या डोंगरावर "बोअरवेल' खोदण्यात आल्याने त्याचा परिणाम पायथ्याशी असलेल्या माटवे गावावर होणार आहे. या प्रकल्पामुळे हा संपूर्ण गाव संकटात सापडला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
सुमारे १ लाख २० हजार चौरसमीटरची ही जागा आनंद चंद्र बोस यांच्या मालकीची आहे. त्यांनी त्यातील सुमारे ७७ हजार चौरसमीटर जागा डीएलएफ कंपनीच्या सरावती बिल्डर कंपनीला विकली. सरावती बिल्डरने मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाकडे परवान्यासाठी अर्ज केला ; परंतु ९० दिवस त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने आपोआपच ते मान्य झाल्याचा अर्थ होतो. या आधारावर कंपनीकडून नगर नियोजन खात्याकडे अर्ज करण्यात आला व तिथे त्यांना परवाने देण्याचा निर्णय झाला. प्रत्येक खात्याने कायदेशीर पळवाटेचा आधार घेऊन या कंपनीला मदत केली असा आरोपही यावेळी सबिना मार्टीन्स यांनी केला. या भागाचे आमदार नियोजन विकास प्राधिकरणाचे सदस्य असूनही हा प्रकल्प इथे उभा राहत आहे, असा ठपकाही त्यांनी ठेवला. नियोजन विकास प्राधिकरण हा प्रादेशिक विकास आराखड्याचा भाग असेल असे सांगण्यात येत असले तरी या प्रकल्पाला ज्याअर्थी परवाने देण्यात आले ते पाहता सरकार सामान्य जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकत असल्याची टीकाही यावेळी सबिना मार्टीन्स यांनी केली.

No comments: