Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 6 October, 2009

खासदार सार्दिन गेले कुठे?

आगोंद, दि.५ ( वार्ताहर): काणकोणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सारी सरकारी यंत्रणा कामाला लागली असल्याचे चित्र दिसत असले तरी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी मात्र अजूनही याठिकाणी भेट दिलेली नाही. या प्रकारामुळे काणकोणवासीयांनी नाराजी व्यक्त केलीच आहे, शिवाय खुद्द कॉंग्रेसचे पदाधिकारी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचार करताना, आपण मतदारांपर्यंत जाणार नाही तर जनतेने आपल्या समस्या घेऊन मडगाव येथे यावे व आपली भेट घ्यावी, असे वक्तव्य खासदार सार्दिन यांनी केले होते हे उल्लेखनीय!
यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना उत्तर गोव्यातील एक ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आर्सिनियो डिसिल्वा म्हणाले की, पुराच्या संकटात सापडलेले १०० टक्के लोक हे भूमिपुत्र असून सरकारने कोणताही भेदभाव न बाळगता त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे. फक्त लाल दिव्यांच्या गाड्या घेऊन फिरण्याऐवजी स्थानिक पातळीवरील कामांना वेग दिला पाहिजे. दक्षिण गोव्यातून खासदार म्हणून निवडून आलेले खासदार सार्दिन यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून तरी याठिकाणी येणे जरुरीचे होते, अशा शब्दात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काल संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्र्यांच्या काणकोण भेटीदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
सरकारी पातळीवरून आपद्ग्रस्तांना ज्या वेगाने मदत मिळणे गरजेचे होते तसा वेग याठिकाणी दिसत नसून, शासकीय अधिकारी नियोजनबद्धरीत्या काम करताना कमी पडत असल्याची प्रतिक्रिया लोलये येथील समाज कार्यकर्ते मोहनदास लोलयेकर यांनी व्यक्त केली.
पाण्याचा प्रवाह आणि पूर यांचा अभ्यास केल्यास हा महापूर केवळ पावसाच्या पाण्यामुळे नव्हे तर नैसर्गिक घडामोडी व ढगफुटीसारख्या प्रकारामुळे आला असल्याची शंका ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार कमलाकर म्हाळशी यांनी व्यक्त केली. भर दुपारी हा पूर आल्याने अधिक जीवितहानी टळल्याचे सांगून रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला असता तर काय घडले असते त्याचा विचार भयावह आहे, असे ते म्हणाले.
दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी घेण्यासाठी पहुडलो असता जमिनीखालून बुडबुड्यांचा असा आवाज ऐकू आला व क्षणात पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला. सगळीकडेच पाणीच पाणी दिसू लागले. खोतीगाव परिसरातील डोंगरावरून विचित्र प्रकारचे झरे वाहताना दिसले. या अपवादात्मक घटनेमागचे रहस्य उघड होणे गरजेचे असल्याचे मत खोतीगावचे ज्येष्ठ समाज कार्यकर्ते एस. के. गावकर यांनी व्यक्त केले.
२ ऑक्टोबर या दिवशी सकाळी पक्ष्यांचा मोठा थवा समुद्रावरून जमिनीच्या दिशेने येत असल्याचे काहींनी गालजीबाग तळपण याठिकाणी पाहिले असल्याचे येथील स्थानिकांनी प्रतिनिधीला सांगितले.
एकूणच विविध भागांतील स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेतले असता मुख्यमंत्र्यांनी काणकोणातील या पुरासंबंधी कारण मीमांसा करण्यासाठी सागर विज्ञान संशोधन केंद्राचे संचालक सतीश शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने त्वरित कामाला लागून पुराचे रहस्य जनतेसमोर आणणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

No comments: