Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 6 October, 2009

राज्यातील शेतकऱ्यांनाही तातडीची मदत द्या : पार्सेकर

पणजी, दि.५ (प्रतिनिधी): काणकोण तालुक्यात पुराने हाहाकार माजवला आहेच परंतु पावसाचा परिणाम काणकोणसह राज्याच्या इतर भागांतील शेती व्यवसायावरही झाला आहे. कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी तात्काळ राज्यातील सर्व भागातील पिकांच्या नासाडीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत पुरवण्याची गरज आहे; पण त्याबाबत सरकारला काहीच पडून गेलेले नाही, असा आरोप करून शेतकऱ्यांबाबत सरकारकडून दुर्लक्ष करण्याच्या कृतीचा जाहीर निषेध भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला.
आज भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते खास शेतकऱ्यांच्या विषयावर बोलत होते. मुळातच राज्यात शेतीचे प्रमाण घटत आहे. सुमारे ७५ टक्के शेती पडीक आहे व त्यात २५ टक्के लोकांनी घाम गाळून उभे केलेले पीक या पावसामुळे आडवे झाले आहे. काही ठिकाणी कापणी करून पीक शेतात ठेवले होते, ते देखील वाहून गेले आहे. राज्यात अधिकतर नदी शेजारी असलेल्या खाजन शेतीचे पीक पावसाच्या पाण्यामुळे नष्ट झाले असून या शेतकऱ्यांची दखल सरकारने घ्यायलाच हवी, असे पार्सेकर म्हणाले. विद्यमान सरकारच्या राज्यात शेतकऱ्यांना एकामागोमाग एक तडाखे बसत आहेत. गेल्या मार्च २००८ महिन्यात राज्यात आलेल्या अवेळी पावसामुळे मिरची, काजू, केळी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. याच काळात अधिवेशन सुरू होते, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देण्याची घोषणाही केली. विविध ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले व नुकसानीचा आकडा सव्वा नऊ कोटी रुपये असल्याचा अहवाल सादर केला. या शेतकऱ्यांना अद्याप सव्वा रुपयादेखील मदत मिळाली नाही. आंबा व काजूचे पीकही यावेळी कमी झाले, त्यात आता कापणीसाठी तयार असलेल्या पिकाचीच नासाडी झाली आहे, असे पार्सेकर म्हणाले. सुपारीच्या पिकावरही या पावसाचा परिणाम जाणवत असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे, अशी मागणी पार्सेकर यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे, अन्यथा काही प्रमाणात शिल्लक राहिलेली शेतीही कालबाह्य होण्याचा धोका संभवत असल्याची शक्यता श्री. पार्सेकर यांनी व्यक्त केली.

No comments: