Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 9 October, 2009

आणखी दोन घरे कोसळली

आगोंद, दि. ८ (वार्ताहर)- काणकोण येथील पूरग्रस्त भागाचे सर्वेक्षण एकूण ९३ घरे जमीनदोस्त झाल्याचा अहवाल तयार झालेला असतानाच आता खोतीगाव पंचायतक्षेत्रातच काल व आज मिळून एकूण दोन घरे कोसळली आहेत. याशिवाय धोकादायक स्थितीत असलेली आणखी दोन घरे केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. पावसाच्या तडाख्याने कमकुवत झालेली घरे आता हळूहळू कोसळण्यास सुरूवात झाल्याने वास्तविक नुकसान आणि अहवाल यांच्यात तफावत आढळून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खोतीगाव पंचायतक्षेत्रातील दाबेल या वाड्यावर चंद्रकांत पुरसो वेळीप व धाकलो झरो वरक या दोघांची घरे जमीनदोस्त झाली. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धाकलो झरो वेळीप यांचे घर जमीनदोस्त झाल्यानंतर त्वरित अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांना मदत करताना जखमी होऊन त्यांच्या हाताचे हाड मोडल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. याशिवाय चिम्मी वरक व गंगी वरक यांची घरे धोकादायक स्थितीत असल्याने ती केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
पुनर्वसन प्रक्रियेत शासकीय यंत्रणेचे अपयश पुसून काढण्यासाठी स्वयंसेवी संघटना जोमाने कार्यरत असून दात्यांकडूनही सढळहस्ते मदत केली जात आहे. परंतु, प्रत्यक्षात घरे उभी राहणे तेवढेच महत्त्वाचे असून त्यासाठी सिमेंट, रेती, चिरे, वासे, लाकडी दारे या वस्तूंची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया पैंगीण म्हालवाडा येथील प्रभुगावकर कुटुंबातर्फे देण्यात आली.

शेतीचे सर्वेक्षण अजून नाही
काणकोणातील शेतीच्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आल्याचा दावा सरकार करत असले तरीही पैंगीणमधील काही भागातील शेतीच्या नुकसानीचा आढावाच घेण्यात आलेला नाही, असे स्पष्ट झाले आहे. काणकोण आलेल्या प्रलयामुळे सुमारे १७०० शेतकऱ्यांना या पुराचा फटका बसल्याचा प्राथमिक अहवाल आहे. पारयेमळ येथील मानेलीबाग, साकळागाळ येथील शेती पुराच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झाली आहे. उभे पीक नष्ट झाल्यामुळे कारेगाळ येथील गोपाळ वेळीप, चिमट वेळीप, पुरसो वेळीप, मोहन वेळीप यांच्यावर उपासमारीची पाळी येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपद्ग्रस्तांनी तलाठ्यांशी तब्बल तीन वेळी संपर्क साधला असला आहे. परंतु, त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून शेती व बागायतीची साधी पाहणीसुद्धा करण्यात आलेली नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या लोकांनी आज खोला ग्रामपंचायतीत येऊन आपले गाऱ्हाणे मांडले. कृषी खात्याने या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी येथून होत आहे.

No comments: