Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 9 October, 2009

नक्षल्यांच्या हल्ल्यात अठरा पोलिस शहीद

गडचिरोली जिल्ह्यातील लाहिरी येथील थरारक घटना

गडचिरोली, दि. ८ - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी नक्षलवाद्यांना भामरागड तालुक्यातील लाहिरी येथे "सी-६०' या विशेष पोलिस दलातील जवानांना गाठून त्यांच्यावर केलेल्या तुफाना गोळीबारात १८ पोलिस शहीद झाले. त्यामुळे राज्य सरकारला जबर धक्का बसला आहे.
लाहिरीनजिक राणी कोटूर येथे आदिवासी नेता बोगामी यांची समाधी आहे. या समाधीजवळच सुमारे ५०० सशस्त्र नक्षलवाद्यांनी ४० पोलिसांनी चारही बाजूंनी कडे करून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांमध्ये उपनिरीक्षक डी. एस. देशमुख यांचाही समावेश आहे. नक्षल्यांनी घेरल्यामुळे पोलिसांना आपली सुटका करवून घेण्याची संधीच मिळाली नाही. त्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या शस्त्रांद्वारे नक्षल्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तथापि नक्षली मोठ्या संख्येने असल्यामुळे पोलिसांची मात्रा चालली नाही. जेथे हल्ला झाला तेथील दृश्य करुण दिसत होते. सर्वत्र रक्त आणि मांसाचा सडा पडला होता. या भयंकर घटनेमुळे सारा गडचिरोली जिल्हा थरारून गेला आहे.
शहीद पोलिसांचे मृतदेह लाहिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले असून , ते गडचिरोलीला आणण्यासाठी भामरागड येथून ट्रॅक्टर पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान , गडचिरोली जिल्ह्यातच कोरची तालुक्यात नक्षलवाद्यांनी सुरेश खलानी याला ठार मारले.तसेच रामगड ग्रामपंचायत कार्यालय आणि तहसील कार्यालय जाळून टाकले.
याच वर्षी जानेवारी महिन्यात धानोरा पोलिस ठाण्यापासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर जंगलात सशस्त्र नक्षलवाद्यांनी १६ पोलिसांना ठार केले होते. त्यात ५ महिला शिपायांचा समावेश होता.
राज्याचे पोलिस महासंचालक (निवडणूक व्यवस्था) अनामी रॉय यांनी बुधवारी नागपूरमध्ये वार्ताहर परिषदेत शेजारच्या राज्यांमधून नक्षलवादी राज्यात आल्याचे आणि ते दहशतवादी कारवाया करण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. पोलिसांनीही मतदान लक्षात घेता भक्कम बंदोबस्त केला आहे, त्यादृष्टीने केंदीय राखीव पोलिस दलाची आणि अन्य पोलिस दलांची मदत घेण्यात आली आहे, असे रॉय यांनी सांगितले.
रॉय गेल्या तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथे निवडणूक व्यवस्थेचा तसेच कायदा सुव्यवस्थेबाबतच्या उपायांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणूक तीन टप्प्यात झाली होती. त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ मिळू शकले. मात्र विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होत आहे. मतदानात अडथळे येऊ नयेत म्हणून गडचिरोलीत विशेष काळजी घेण्यात येत आहे. तेथे बुलेटप्रूफ वाहने देण्यात आली आहेत. गतवेळच्या मतदानाच्या वाढत्या टक्केवारीमुळे नक्षलवाद्यांमध्ये अस्वस्थता आहे, असे ते म्हणाले.
राज्यभरात ५२,७०० जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ४७, ६१६ परवाना शस्त्रे आणि २९५ बिगरपरवाना शस्त्रे जमा करण्यात आली. तर ४२ हजार जणांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले, अशी माहितीही त्यांनी दिली.
रॉय यांची उलटसुलट विधाने
अलीकडे नक्षलवाद्यांकडून काही जणांना ठार मारण्याचे प्रकार झाले आहेत. या स्थितीत काही नक्षलवाद्यांना पकडण्यात आले आहे, काहीजण पोलिसांकडून मारण्यात आले. मात्र, किती नक्षलवादी पकडण्यात आले वा किती पोलिसांकडून ठार करण्यात आले, याची माहिती नसल्याचे रॉय म्हणाले. त्याचप्रमाणे रॉय यांनी गडचिरोलीतील मतदान शांततेत व्हावे म्हणून हेलिकॉप्टर देण्यात आली आहेत का, याबाबत नेमके उत्तर दिले नाही. मात्र, नंतर चार हेलिकॉप्टर देण्यात आली आहेत, असे सांगितले. निवडणूक आयोगाच्या सक्त निर्बंधांमुळे कोणत्या ठिकाणी किती पोलिस बळ पुरवण्यात आले आहे, याचा तपशील देता येत नसल्याचे ते म्हणाले.
चंद्रपूरच्या पोलिस अधीक्षकांनी पोलिस बंदोबस्ताचा तपशील वार्ताहरांना दिला तर राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून आपण का माहिती देऊ शकत नाही, यावर रॉय यांनी पोलिस अधीक्षकांनी दिलेली माहिती चुकीची (इनकरेक्ट) असल्याचे सांगितले.

No comments: