Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 2 October, 2008

अल्पसंख्याकवाद पोसल्याने देशात दहशतवाद फोफावला, लालकृष्ण अडवाणी यांचा घणाघाती आरोप


विजय संकल्प रॅलीला आरंभ
कृषी क्षेत्राला सर्वोच्च स्थान
दहशतवाद व भ्रष्टाचारमुक्त
सरकार देण्याचा विजय संकल्प

वाशीम, दि. १ : पंतप्रधान मनमोहनसिंग हे अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांच्यासारख्या विद्वान माणसाने देशाच्या तिजोरीवर पहिला अधिकार अल्पसंख्यक असलेल्या मुसलमानांचा आहे, असे वक्तव्य करणे अतिशय खेदजनक आहे. कॉंग्रेसप्रणीत केंद्र सरकारने अशाप्रकारे अल्पसंख्याकवाद पोसल्याने आज देशात दहशतवाद फोफावला असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे राष्ट्रीय नेते व लोकसभेतील विरोधीपक्ष नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज वाशीम येथील विजय संकल्प रॅलीत केला. रॅलीला वाशीम, अकोला, अमरावती, बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यातून १ लाख लोक उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर झालेल्या या रॅलीला राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, विधान परिषद विरोधीपक्ष नेते भाऊसाहेब फुंडकर, विधान सभेतील पक्षनेते एकनाथ खडसे व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
देशात अल्पसंख्यक व बहुसंख्यक असा वाद नाही तर, गरीब आणि श्रीमंत हा भेद आहे. देशाच्या तिजोरीवर अल्पसंख्यक मुसलमानांचा नाही तर गरिबांचा पहिला अधिकार आहे. गरीब मग तो हिंदू, मुसलमान, शीख अथवा कोणत्याही धर्माचा असो, त्याचा देशाच्या खजिन्यावर प्रथम हक्क असल्याचे अडवाणी म्हणाले.
तीर्थस्थळांचा विकास करणार
हिंदुस्थानात विविध धर्माचे लोक राहतात. विविध धर्माची प्रमुख तीर्थस्थळे भारतातच आहेत. त्या ठिकाणी देशविदेशातून मोठ्या संख्येत भाविक येत असतात. तेव्हा, देशातील तीर्थस्थळे व भक्तांची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे. भाजपा आघाडीचे सरकार आल्यास तीर्थस्थळांचा विकास करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येईल, असे आश्वासन अडवाणी यांनी यावेळी दिले.
राजस्थानमधील चामुंडादेवी, सातारा येथील मांडरदेवी या तीर्थस्थळी झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचे प्राण गेले. तीर्थस्थळी भाविकांना आनंद व समाधान मिळाले पाहिजे. पण, येथे लोकांना जीव गमवावा लागला. ही अत्यंत क्लेशदायक घटना असल्याचे अडवाणी म्हणाले. तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येत विदेशातून भाविक भारतात येतात. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून देशांतर्गत व्यापाराला गती मिळू शकते. यावर लक्ष केंद्रित करून देशभरातील तीर्थस्थळांचा विकास करण्याचा या सभेत संकल्प करण्यात आला.
दहशतवाद व भ्रष्टाचाराविरूध्द कठोर कारवाई
पॅकेजमधील दुधाळ जनावरे वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत खंत व्यक्त करताना अडवाणी म्हणाले की, विदर्भात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या दु:खी परिवारजनांना पंतप्रधान पॅकेजमार्फत दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले. त्यातही काही नेत्यांनी भ्रष्टाचार करून ही जनावरे आपल्या दावणीला बांधली. हा भ्रष्टाचार नसून ते पाप आहे. रालोआचे सरकार आल्यास दहशतवाद व भ्रष्टाचाराविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल. रालोआ दहशतवाद व भ्रष्टाचारमुक्त सरकार देशाला देईल, असा संकल्प त्यांनी १ लाखाच्या सभेत केला.
उत्तम कृषी, मध्यम व्यापार व कनिष्ट नोकरी अशी म्हण आपल्याकडे प्रचलित होती. पण, आता त्याच्या नेमकी विरूध्द परिस्थिती आहे. कृषीला शेवटचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी कृषी सिंचनासाठी नदीजोडणी प्रकल्प हाती घेण्यात येईल, असे अडवाणी म्हणाले. नंतर मुंडे व अन्य नेत्यांनीही खुमासदार शैलीत भाषणे केली.
मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे व लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रातिनिधिक स्वरूपात अर्थसहाय करण्यात आले.
या सभेत बाहेरगावहून आलेल्या कार्यकर्त्यांसाठी खिचडीची व्यवस्था करण्यात आली होती. १९ क्विंटल खिचडी वितरित करण्यात आल्याचे व्यवस्थेतील कार्यकर्त्यांनी सांगितले. तळपते उन असतानाही श्रोते अडवाणींचे भाषण ऐकण्यासाठी सभास्थळी बसून होते.

No comments: