Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 28 September, 2008

दक्षिण गोव्यात ६ जण बुडाले, एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता, तिघे बचावले


मडगाव व वास्को, दि. २७ (प्रतिनिधी): दक्षिण गोव्यामध्ये आज सहाजण बुडाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता आहेत. तसेच तिघांना वाचवण्यात यश आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
आज जागतिक पर्यटन दिना दिवशी खणगिणी काब द राम येथे व बेतालभाटी समुद्रात सहा तरुण बुडाले. त्यातील ३ तरुणांना वाचविण्यात यश मिळाले. वाचवण्यात आलेल्यांपैकी दोघांची स्थिती गंभीर असून त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कालच कोलकाता येथील दंत विद्यालयातील विद्यार्थी डॉ.जितेश धवन हा कोलवा समुद्रात बुडाला होता. ती घटना ताजी असतानाच आज हा प्रकार घडला.
आज बुडालेल्यांमध्ये सर्वजण १८ ते १९ वयोगटातील असून तिघे वास्को येथील जहाजबांधणी अभियंता विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.ही दुर्घटना दुपारी अडीचच्या दरम्यान घडली. वास्को येथील जहाजबांधणी अभियंता विद्यालयाचा १७ विद्यार्थ्यांचा गट दक्षिण गोव्यातील खणंगिणी येथील "काब द राम' किल्ल्याजवळ सहलीसाठी गेला होता. मौजमजा करून झाल्यावर दुपारी योहान कुवारप्पा यशोदास (१८), अमित सदाशिव कुटरे(१८) व प्रणय पावणीकर (१९) हे तिघे समुद्रात पोहायला गेले. त्यानंतर काही वेळातच योहान व अमित लाटांबरोबर वाहत खोल समुद्रात गेले व बेपत्ता झाले. प्रणय पावणीकर गटांगळ्या खाऊ लागला. कोणीतरी त्याला झाडाची फांदी देऊन आधार दिला. त्यानेही प्रयत्नाने ती पकडली व आरडाओरडा करून स्पीड बोट बोलावली. तात्काळ त्यांनी येऊन प्रणयला वाचविले. पाण्याबाहेर काढून प्रथमोपचार केल्यानंतर त्याची प्रकृती सुधारली. पण योहान व अमितचा पत्ता लागला नाही. त्यामुळे योहान व अमित यांच्या घरी दुःखाचे वातावरण असल्याचे दिसून आले. या दोघांचेही वडील वास्कोतील गोवा शिपयार्डमध्ये कामाला आहेत. कुंकळ्ळी पोलिसांनी अग्निशामक दल व स्पीड बोटींच्या मदतीने सर्वत्र तपास केला; पण सायंकाळी उशिरापर्यंत ते सापडले नाहीत. पोलिसांचे व पाणबुड्यांचे प्रयत्न याकामी सुरू असल्याचे कुंकळ्ळी पोलिसांनी सांगितले.
बेतालभाटीत दुसरी घटना
दुसरी घटना सनसेट बीच बेतालभाटी येथे दुपारी २ ते २.३० च्या
दरम्यान घडली. चांदर येथील ५ तरुण मौजमजेसाठी या ठिकाणी आले होते. त्यातील रॉजर वाझ, (१८), ब्रॅंड मार्कुस (१८) व मेलन गोम्स (२०) सांगे हे तिघेजण आंघोळीसाठी समुद्रात गेले. काही वेळाने तिघेही गटांगळ्या खाऊ लागले. किनाऱ्यावरील लोकांनी आरडाओरडा करताच जीवरक्षकांनी मोठ्या परिश्रमाने तिघांना वर काढले तेव्हा त्यांची स्थिती गंभीर होती. प्रथमोपचारानंतर हॉस्पिसियो इस्पितळात नेताना रॉजर वाझ याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. ब्रेन्ड व मार्लन यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस समुद्र किनाऱ्यावर पोहायला जाणे धोकादायक बनले आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहली समुद्रकिनाऱ्यावर जात असल्यास त्याची आगाऊ लेखी सूचना स्थानिक पोलिस स्थानकावर देण्याचा नियम आहे. तथापि, तशी सूचना मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या ९ महिन्यात दक्षिण गोव्यात आजपर्यंत १४ जणांचे बळी गेले आहेत.त्यात देशी पर्यटकांचा त्यातही विद्यार्थ्यांचा समावेश आहे.कोलवा समुद्रात ६ जणांचे बळी गेले होते. काणकोणच्या गालजीबाग किनाऱ्यावर ४ जणांचा बळी गेला तर आज खणगिणी व बेतालभाटी येथे बुडाले. या विद्यार्थ्यांशिवाय पाळोळे व माजोर्डा येथे दोघांचे निधन झाले होते.देशी व विदेशी पर्यटक तसेच विद्यार्थी दारूच्या नशेत समुद्रात पोहण्यासाठी जातात व प्राण गमावबन बसतात.

No comments: