Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 28 September, 2008

तीन वर्षे, तीन शनिवार व तीन बॉम्बस्फोट!


नवी दिल्ली, दि. २७ : देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात आज शनिवारी आणखी एक बॉम्बस्फोट झाला. गेल्या तीन वर्षात शनिवारी झालेला तिसरा बॉम्बस्फोट होय.
आज पुन्हा बॉम्बस्फोट होताच दिल्लीकरांना दोन आठवड्यापूर्वी तसेच २९ ऑक्टोबर २००५ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेची आठवण झाली. हे दोन्ही बॉम्बस्फोटही शनिवारीच झाले होते, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. कदाचित स्फोट घडवून आणण्यासाठी अतिरेक्यांना शनिवार सोईस्कर वाटत असावा, अशी प्रतिक्रिया आजच्या स्फोटानंतर मेहरौली भागातील एका दुकानदाराने व्यक्त केली आहे.
तीन वर्षांपूर्वी दिवाळीच्या दिवसांत अतिरेक्यांनी दिल्लीत घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात ६० लोक मृत्युमुखी पडले होते तर या महिन्यातच अतिरेक्यांनी याच शहरात घडवून आणलेल्या बॉम्बस्फोट मालिकेत २४ लोक ठार झाले होते. आज घडवून आणलेल्या स्फोटात एक जण ठार, तर १८ जण जखमी झाले आहेत.
दिल्लीत आतापर्यंत घडवून आणलेल्या स्फोटांचा इतिहास बघता अतिरेकी शनिवारी व विशिष्ट वेळेलाच का बॉम्बस्फोट घडवून आणतात, याचीही चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी एक स्थानिक नागरिक सूरज कुमारने केली आहे. यावर्षी २६ जुलै रोजी गुजरातमधील अहमदाबाद शहरात बॉम्बस्फोट मालिका घडवून आणण्यात आली व वार होता शनिवार. या स्फोटांत जवळपास ४५ लोक ठार झाले होते.

शिवराज पाटील यांनी राजीनामा द्यावा : भाजप
नवी दिल्ली, दि. २७ : देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाल्यानंतर देशात वारंवार होणाऱ्या या दशहतवादी घटनांकडे बघता केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना आपल्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहात नाही. सबब त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने आज केली आहे.
भाजपाचे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असलेले विजयकुमार मल्होत्रा यांनी बॉम्बस्फोटानंतर लगेचच घटना स्थळाला भेट दिली व देशातील सुरक्षा स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे अधिवेशन ताबडतोब बोलाविण्याची मागणी केली. गृहमंत्री पाटील यांच्यावर हल्ला करताना भाजपा नेते मल्होत्रा म्हणाले, आपले कपडे तीन वेळा बदलण्याऐवजी सर्वसामान्य जनतेशी निगडित बाबींवर विचारविनिमय करण्यासाठी पाटील यांनी काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात. हे सर्व करण्याऐवजी अतिरेक्यांसाठी पैसा गोळा करणे सुरू आहे, त्यांच्यासाठी निदर्शनेही केली जात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज देशातील वातावरण फारच खराब झालेले असून देशात कोठेही बॉम्बस्फोट घडवून आणण्यात अतिरेक्यांना आता कोणतीही भीती वाटेनाशी झाली आहे. अतिरेक्यांच्या या स्फोटांनी लोक घाबरलेले आहेत. समजा आपण पकडलो गेलो तर सरकारकडूनच आपल्याला पैसा व कायदेशीर पाठिंबा दिला जातो याची अतिरेक्यांना कल्पना आहे, याकडेेेेही त्यांनी लक्ष वेधले.

राजधानीतील स्फोटाने कॉंग्रेस पक्षही हादरला
नवी दिल्ली, दि. २७ (रवींद्र दाणी): केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुनसिंग यांनी काल अतिरेक्यांच्या समर्थनाची भूमिका घेतल्यानंतर २४ तासांच्या आत आज राजधानीत झालेल्या बॉम्बस्फोटाने सरकार व कॉंग्रेस पक्षाची स्थिती अडचणीची झाली आहे. बरोबर १५ दिवसांपूर्वी राजधानीत झालेल्या बॉम्बस्फोटातील दोघा संशयितांना कायदेशीर व आर्थिक मदत देण्यास अर्जुनसिंग यांनी पाठिंबा दिला आहे.
आजच्या बॉम्बस्फोटानंतर अर्जुनसिंग व जामिया मिलिया इस्लामियाचे कुलपती मशरुल हसन यांच्याविरुध्द वातावरण तापले असून हसन यांना अटक करण्याची मागणी शहीद पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांची पत्नी माया शर्मा यांनी केली आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी राजधानीत जामियाच्या विद्यार्थ्यांनी दोघा संशयितांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. तर काल चांदणी चौकचे खासदार व केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी जामियानगरला भेट देऊन स्थानिक नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. सिब्बल यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहेत हे येथे उल्लेखनीय.
उच्चस्तरीय बैठक
पंतप्रधान अमेरिकेत असताना आज राजधानीत पुन्हा झालेल्या बॉम्बस्फोटाने सरकार व कॉंग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या निवासस्थानी झालेल्या एका उचचस्तरीय बैठकीत बॉम्बस्फोटानंतरच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. गृहमंत्री शिवराज पाटील यांनीही आपल्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबर परिस्थितीवर चर्चा केल्याचे समजते. आजच्या बॉम्बस्फोटाने दिल्ली पोलिसांसमोर तर आव्हान निर्माण केलेच आहे. पण, मोठे आव्हान राजकीय असून ते कसे हाताळावयाचे याची चिंता कॉंग्रेस पक्षाला भेडसावीत आहे. विशेषत: मानव संसाधन मंत्री अर्जुनसिंग यांनी जामियाच्या कुलपतींच्या पाठिशी उभे राहणे कॉंगे्रस पक्षाला महागात पडण्याची चिन्हे आहेत.
आण्विक करार
राजधानीत होत असलेल्या बॉम्बस्फोटांनी आण्विक कराराची चमक फिकी पडली आहे हे कॉंग्रेस पक्षातूनही मान्य केले जात आहे. आण्विक कराराच्या शिदोरीवर आम्ही लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. पण आता दहशतवाद हाच निवडणुकीचा मुख्य मुद्दा होऊ असतो असे कॉंगेे्रस पक्षात बोलले जात आहे.

No comments: