Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 1 October, 2008

गोमंतकीयांचा हवाला केवळ दैवावरच! दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी साधनांचीच कमतरता


ताबडतोब नवी चाके बसवलेला हाच तो कंटेनर. (छाया: सागर अग्नी)

पणजी, दि. ३० (सागर अग्नी): गोवा हे अतिरेक्यांचे पुढील लक्ष्य असल्याची माहिती उजेडात आल्यापासून शांतताप्रिय गोव्याभोवती दहशतीचे ढग जमा झाले आहेत. या दहशतीच्या सावटात गोव्याची सुरक्षा सांभाळाणाऱ्या पोलिस खात्यातच प्रशिक्षित मनुष्यबळ, साधने तसेच बॉंब निकामी करणारे पथक आणि श्वानपथकांची कमालीची उणीव असून सुरक्षा यंत्रणाच सक्षम नसल्यामुळे गोमंतकीयांचे भवितव्य कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांच्या हाती नव्हे तर फक्त दैवावर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात आजपासून नवरात्रोत्सवास सुरूवात झाली आहे. विविध ठिकाणी सार्वजनिक दुर्गापूजनोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून कधी नव्हे ते बाजार, बसस्थानके व रेल्वेस्थानकानंतर आता या उत्सवाच्या ठिकाणीही पोलिसांची फौज देखरेखीसाठी दाखल झाली आहे. साध्या व खाकी वेषातील पोलिस सावधगिरीचा उपाय म्हणून परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. पूजेच्या वेळी अशा उत्सवात प्रचंड गर्दी होत असल्याने त्यावेळी काही अघटित घडेल या भीतीने सुरक्षा यंत्रणेला संत्रस्त केले असून सर्व शक्तीनिशी पोलिस दल सज्ज नाही हे त्याचे खरे कारण ठरले आहे.
बॉंबस्फोटप्रकरणी दिल्लीत पकडलेल्या अतिरेक्यांनी गोव्यातील घातपाताचा आपला कट उघड केल्यावर लगेचच रेल्वेमार्गे केरळहून गोव्यात अतिरेकी किंवा स्फोटके येत असल्याची माहिती गोवा पोलिसांना अलीकडेच देण्यात आली होती. तेव्हापासून राज्यातील सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून दक्ष असली तरी आवश्यक मनुष्यवळ, श्वान व बॉंब निकामी करणाऱ्या पथकांच्या अभावामुळे त्यांची तारांबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून सुरक्षा यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढला असून पणजी व मडगाव बसस्थानक उडविण्याच्या कालच्या धमकीनंतर तो स्पष्ट दिसून आला.
एकाचवेळी मडगाव किंवा पणजी बसस्थानकावर स्फोट घडविण्याच्या निनावी दूरध्वनीने सुरक्षा यंत्रणेला हादरवून टाकले. एकाचवेळी दोन्ही ठिकाणी पाठविण्यासाठी या यंत्रणेकडे बॉंब शोधणारे प्रशिक्षित श्वानच नव्हे तर बॉंब निकामी करणारे पथकही नव्हते. "कुकी' हे एकमेव श्वान बॉंब शोधून काढण्यात निष्णात असून कालच्या दूरध्वनीनंतर या श्वानाला पणजी स्थानकावर नेण्यात आले. मडगावात इतर कामात प्रशिक्षित असलेल्या कुत्र्यांचा वापर करण्यात आला. या दलाकडे बॉंब निकामी करणारे ९ सदस्यीय केवळ एकमेव पथक असून या पथकाच्या ऐनवेळी दोन तुकड्या करून त्यांना पणजी व मडगावात शोधमोहिमेवर पाठविण्यात आल्याने सुसज्ज नसलेल्या पोलिस दलाची हतबलता उघडी पडली आहे.
महत्त्वाचे म्हणजे गोवा हा पर्यटनासाठी प्रसिध्द असून देशविदेशातील हजारो पर्यटकांचे तो नंदनवन ठरला आहे. येथील रूपेरी वाळूने नटलेल्या किनाऱ्यांनी सदैव पर्यटकांना मोहिनी घातली आहे. गोव्यातील पर्यटकांनी गजबजलेली ठिकाणे ही अतिरेक्यांची लक्ष्ये असू शकतात हे नवे नाही. गोव्यात याआधीही बॉंब पेरल्याच्या वावड्या पसरवण्यात आल्या होत्या. मात्र दिल्लीत पकडलेल्या अतिरेक्यांनी गोव्याचा स्पष्ट उल्लेख केल्याने यावेळी ती अफवा असेल असे म्हणून सुरक्षा यंत्रणेला स्वस्थ बसता आले नाही. यंत्रणा आवश्यक तेवढी सक्षम नसल्यानेच गांभीर्याने सर्वत्र शोधाशोध करताना यंत्रणेची पुरती दमछाक झाली ही वस्तुस्थिती पोलिस खाते कदापिही नाकारणार नाही.
गोवा राखीव पोलिस दलाच्या आवारात बऱ्याच काळापासून बॉंब सापडलाच तर निर्जनस्थळी नेऊन त्याचा स्फोट घडविण्यासाठी एक लोखंडी कंटेनरही आहे. परंतु या कंटेनरची चारही चाके कधी गायब झाली याचा कोणालाही थांगपत्ता लागला नाही. चाके गायब झाल्याने बॉंब सापडला तर त्याचा निर्जनस्थळी स्फोट घडविण्यासाठी हा कंटेनर हलवायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी या खात्याची अवस्था जणू "आधीच मर्कट तशात मद्य प्याला' अशी बनली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोवा राखीव पोलिस दलाच्या इमारतीच्या मागील बाजूची अलिकडेच पाहाणी केल्यावेळी चाके गायब होण्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेत चारही चाके बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला केवळ एका तासाची मुदत दिली. दिलेल्या मुदतीत ती चाके न बसविल्यास थेट घरी पाठविण्याचा इशाराही त्यांनी त्या अधिकाऱ्याला दिला. त्यानंतर या कंटेनरच्या गाड्याला कुठे चाके चढवण्यात आली.
गेल्या काही दिवसांत जरी घातपातासाठी गोव्याचे नाव अतिरेक्यांच्या कटात घेतले जात असले तरी काही अघटित घडण्यापूर्वीच आपली यंत्रणा सुसज्ज असणे क्रमप्राप्त होते. असे असताना आता आणखी दोन बॉंब निकामी करणारी पथके व दोन बॉंब हुडकून काढणारे श्वान पोलिस दलात आणले जाणार आहेत. दहशतवाद प्रतिबंधक विभागही स्थापन करण्याच्या हालचाली पोलिस खात्यामधून सुरू झाल्या असल्या तरी सुरक्षा यंत्रणा सव४ शक्तीनिशी सुसज्ज होईतोवर गोमंतकीयांची सुरक्षा दैवावर विसंबून असेल हे मात्र खरे.

No comments: